मुख्याधिकाऱयांची कृती रास्त नव्हे, नगरविकासमंत्र्यांकडे विषय मांडणार : आमदार सरदेसाई
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेत आरोग्य नियमांनुसार वीज वा पाण्याच्या जोडणीसाठी देण्यात येत असलेले ना हरकत दाखले नव्याने ताबा घेतलेले मुख्याधिकारी रोहित कदम यांनी बंद केले आहेत. याचे पडसाद रविवारी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी बोलाविलेल्या ‘संडे डायलॉग्स’मध्ये उमटले. मुख्याधिकाऱयांची ही कृती रास्त नसून सरकारच्या आरोग्य नियमांच्या अंतर्गत ना हरकत दाखला देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्याधिकारी यासंदर्भात आलेल्या अर्जांना नाही म्हणू शकत नाही. आपण नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे हा विषय मांडणार असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
मध्यंतरी मुख्य सचिवांनी एक परिपत्रक काढले होते. त्यात पीडीएकडून पाणी व वीजजोडणीसाठी मंजुरी दिली जात असल्याने पालिकेकडून असे ना हरकत दाखले घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यावर बोट ठेवून मुख्याधिकारी कदम सदर दाखल्यांसाठीचे अर्ज हातावेगळे करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सरदेसाई यांनी हे योग्य नसल्याचे म्हंटले आहे. काही रहिवाशांची घरमालक वीज व पाणीजोडणी घेण्याच्या बाबतीत अडवणूक करत असतात. त्यामुळे आरोग्य कायद्याच्या अंतर्गत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुख्य सचिवांचे परिपत्रक असल्यास ते फक्त मडगाव पालिकेला लागू होते काय, अन्य पालिकांकडून असे ना हरकत दाखले का दिले जातात, असे सवाल सरदेसाई यांनी केले. बंद करायचे असल्यास सर्व 13 पालिका व मनपाकडून हे दाखले देणे बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारच धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. त्यामुळे आपण नगविकासमंत्री राणे यांच्या नजरेस हे आणून देणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. फातोर्डातील 1 ते 6 या प्रभागांसाठी ही बैठक होती. नगरसेवक तसेच अधिकाऱयांची व नागरिकांची मोठय़ा संख्येने त्यास उपस्थित होती. यावेळी विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याचे ठरविण्यात आले. पुढील रविवारी प्रभाग 7 ते 11 तसेच प्रभाग 23 ची बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्याधिकाऱयांची अनुपस्थिती बनली चर्चेचा विषय
दरम्यान, सदर संडे डायलॉग्सला मुख्याधिकारी कदम यांनी उपस्थिती न लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला. यासंदर्भात आमदार सरदेसाई यांना विचारले असता मुख्याधिकाऱयांनी आपण उपस्थित राहू शकत नसल्याचा संदेश पाठविला होता आणि आपण पालिका अभियंत्यांना नियुक्त करत असल्याचे सांगितले होते, असे स्पष्ट केले. त्यानुसार अभियंत्यांनी उपस्थिती लावली. मुख्याधिकाऱयांना बैठकीचे आमंत्रण शेवटच्या घडीला मिळाल्याने त्यांना उपस्थिती लावणे शक्य झाले नसावे, असे सरदेसाई म्हणाले. मात्र पुढील संडे डायलॉग्ससाठी ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. अलीकडेच पालिकेत नागरिकांकडून सल्ले व समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी बैठक बोलाविली होती. काही कारणांस्तव ती होऊ शकली नाही. आमचे संडे डायलॉग्स हेही नागरिकांकडून सल्ले व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी असल्याने मुख्याधिकारी पुढील बैठकीला निश्चितच येतील अशी अपेक्षा बाळगुया, असे सरदेसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले.