अध्याय चोविसावा
संख्यादर्शनात मांडलेले ब्रह्मांडाच्या निर्मितीचे सविस्तर वर्णन भगवंत उद्धवाला समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, उद्धवा! निरिच्छता व विरक्ती यांना एव्हढे महत्त्व आहे की, ज्यांच्या मनामध्ये निरिच्छता नाही, ज्यांनी स्वप्नातही विरक्ती पाहिलेली नाही. त्यांना खात्रीने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रैलोक्मयाच्यावरची गती मिळत नाही. जे माझी भक्ती करीत नाहीत, जे माझी कीर्ती श्रवण करीत नाहीत, जे संसारबंधनांच्या फेऱयांना तोडणारे माझे रामनाम उच्चारीत नाहीत त्यांना पुनः पुन्हा स्वर्गलोक आणि पुनः पुन्हा नरक भोगावा लागतो. त्यानंतर ते पाताळलोक व मृत्युलोक ह्यात अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगतात. जे या तीन गुणात गुंतलेले असून सदासर्वदा लोभिष्ट असतात, जे निरंतर सकाम कर्मच करतात, त्यांना त्यांच्या त्रिगुणात्मक धर्माचे फळ मिळतेच मिळते. आता स्वर्गाची रचना ऐक. जेथपर्यंत सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश पोचतो, तेथपर्यंत पृथ्वीचे महत्त्व आहे. लोकांची वस्ती खालच्या पाताळापासून तो अगदी वरच्या स्वर्गलोकापर्यंत अनेक निरनिराळय़ा लोकांमध्ये आहेच. सूर्याच्या अलीकडेपर्यंत अंतरिक्षाचा विस्तार आहे. त्या अंतरिक्षात यक्ष, रक्ष व गंधर्व ह्यांची वस्ती आहे. अंतरिक्षाच्यावर सूर्यलोकाचा विस्तार सुरू होतो. पृथ्वीपासून लक्षावधि योजनावर सूर्यलोक आहे. काळरूपी सूत्रधार हा वायूपासून बनलेल्या चक्रावर सूर्य, चंद्र व तारालोक यांना गरगर फिरवीत असतो. त्या काळावरही माझी सत्ता आहे. खरोखर माझ्या धाकानेच क्षण, लव, निमिष इत्यादि विभागात तो अधिक-उणेपणा होऊ देत नाही. या कालचक्राची गती मोठी आश्चर्यकारक आहे. एक महिन्याने सूर्य व चंद हे एकत्र येत असतात. नक्षत्रचक्रात चंद्राचे एक परिभ्रमण पूर्ण झाल्यावर आणखी दोन दिवसांनी म्हणजे सुमारे 29॥ दिवसांनी चंद्र सूर्याच्या आड येतो. जो ग्रह आपल्या गतीने सूर्याच्या आड येतो म्हणजे सूर्याच्या जवळ असल्यामुळे दिसेनासा होतो, त्याचा अस्त झाला असे ज्योतिषी सांगतात आणि लोकांना ते खरे वाटते. कारण त्यावेळी तो ग्रह दृष्टीसही पडत नाही. वेदांतात जो दृष्टिसृष्टीचा न्याय सांगितला आहे, तो ज्योतिषशास्त्रामध्येच खरा आहे, कारण वस्तू जरी दिसत नसली तरी ती अस्तित्वातच नाही असे नसते, हे लक्षात ठेव. जे दिसत नाही त्याचा अस्त झाला असे ज्योतिषी लोक समजतात, आणि जो दिसतो त्याची पूजा करतात. ग्रहण लागून ग्रह काही वेळ दिसेनासा झाला, की त्या भागातले लोक ग्रहण लागले असे समजतात. ते लोक त्यावेळी पर्वकाळ मानतात, पण तेच ग्रहण ज्या देशात दिसत नसते त्या देशातील लोक ग्रहण झाले नाही असे समजतात. उदाहरणार्थ, चंद्रग्रहण दिवसा झाले तर ज्या ठिकाणी दिवस असतो तेथे ते दिसत नाही, तसेच रात्री झालेले सूर्यग्रहण जेथे रात्र असते तेथे दिसत नाही. थोडक्मयात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपापल्या कक्षेत फिरत असताना एककेंद्री झाले तर एकमेकांच्या छायेमुळे दिसेनासे होतात. प्रत्यक्षात ते एकमेकांपासून हजारो मैल दूर असल्याने त्यांनी एकमेकांची वाट अडवण्याचा प्रश्नच येत नाही. सूर्यचंद्रांच्या अलीकडे राहुकेतूंची वस्ती आहे. ते राहु-केतु जेव्हा सूर्यचंद्रांच्या बिंबाआड येतात, तेव्हा त्यांनी रवि-चंद्रांचा ग्रास केला असे म्हणतात. खरोखरंच राहु जर सूर्याला गिळीत असता, तर राहूचे तोंडच जळून गेले असते. एका बिंबाआड दुसरे बिंब येते, हेच त्या ग्रहणातील सर्व ग्रासांचे सर्वमान्य तत्त्व आहे. वस्तुतः सूर्य हा सूर्यमंडळांत आपले राज्य करीत असतो, परंतु सूर्यग्रहणाच्या वेळी त्याच्या सर्वग्रासाचे माहात्म्य ज्योतिषी सांगतो आणि ते ग्रहण पाहून सामान्य जनही कोलाहल करतात. सूर्याचे खग्रास ग्रहण म्हटले की, जगात एकच हाहाकार उठतो. परंतु वास्तविक सूर्य व राहु यांची भेटही होत नाही आणि अखेरपर्यंत त्यांचा एकमेकांना स्पर्शही होत नाही. ग्रहमंडळ वेगाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसले, तरी सूर्यचंद्रादिकांना कांही वास्तविक तशी गती नसते. ते आपापल्या अधिकारांच्या मर्यादेतच निश्चितपणे असतात.
क्रमशः