राज्यसभा निवडणुकीत भाजपाकडून पराभव पत्करावा लागल्याने आज होणाऱया विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची खऱया अर्थाने कसोटी लागणार आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने ही दोन मते वगळूनच आघाडीला मतांची बेगमी करणे क्रमप्राप्त ठरेल.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱया या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय अशा पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीमार्फत एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे मैदानात आहेत. यातील भाई जगताप व प्रसाद लाड हे अतिरिक्त उमेदवार मानले जातात. स्वाभाविकच त्यांच्या विजयाकरिता अधिकची मते खेचावी लागतील. भाई जगताप यांना 10, तर लाड यांना 17 अतिरिक्त मतांची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. हे गणित ते कसे जुळवितात, यावर बरेच काही अवलंबून असेल. या निवडणुकीत 285 आमदार मतदान करतील. त्यानुसार निवडून येण्याकरिता 26 ते 27 मते लागू शकतात. राष्ट्रवादीकडे 51 मते असून, त्यांनाही अधिकच्या मताची गरज असेल. तर काँग्रेसकडे 44 आमदार असल्याने त्यांना जास्तीची आठ ते दहा मते लागतील. सेनेकडे 55 आमदार असल्याने त्यांच्या दोन्ही उमेदवारांना 52 मते लागतील. हे पाहता त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात. अधिकृत 3 अतिरिक्त मतांसह तीन समर्थक राज्यमंत्री आणि सहा अपक्ष अशी एकूण 12 अधिकची मते सेनेकडे आहेत. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचा सेनेचा आक्षेप आहे. स्वाभाविकच नाराज सेनेची ही जास्तीची मते सहकारी पक्षांकडे वळतील का, हे पहावे लागेल. भाजपाचे एकूण 106 उमेदवार आहेत. पहिल्या चार उमेदवारांना 26 मते दिली गेली, तर केवळ दोनच मते शिल्लक राहतात. 7 अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरला, तरी आणखी बऱयाच मतांची जमवाजमव करावी लागेल. साहजिकच लाड यांनाही विजयप्राप्तीसाठी बरेच सायास करावे लागतील. मागच्या निवडणुकीत जगताप यांनी लाड यांना पराभूत केले होते. त्याची परतफेड करण्याची लाड यांना संधी असेल. वास्तविक लाड व जगताप हे दोन्ही उमेदवार तगडे मानले जातात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाड’के राजकारणी, अशी टिप्पणी राजकीय वर्तुळात मिश्कीलपणे केली जाते. लाड हे राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही पातळय़ांवर मजबूत आहेत. भाई जगतापही तोडीस तोड आहेत. त्यात त्यांचे सर्व पक्षांतील मंडळींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काटय़ाची टक्कर होईल, असे दिसते. दुसऱया बाजूला अपक्ष आमदारांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या त्या पक्षाशी संबंधित अपक्षांना खेचून आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल, यासाठी सर्वच पक्ष गुंतले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आठ ते नऊ मते फुटल्याचे सांगतात. त्यामुळे विधान परिषदेत ती फुटणार नाहीत, असे म्हणणे हे भाबडेपणाचे ठरेल. आजमितीला कोणताच पक्ष हा धुतल्या तांदळासारखा राहिलेला नाही. कुणी कितीही तात्त्विक गोष्टींचा आव आणला, तरी अशा निवडणुकांमध्ये आमदारांची फोडाफोडी होते आणि त्याकरिता करोडो रुपये मोजले जातात, हे न समजण्याइतपत जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. रणनीती, व्यूहरचना, मतांचा कोटा, त्याचे नियोजन या गोष्टी राज्यसभा वा विधान परिषदेसारख्या निवडणुकीत महत्त्वाच्या असतातच. पण, अर्थबल हा घटकही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे लक्षात घेता सोमवारच्या निवडणुकीतही चमत्कार पहायला मिळाले, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीकडून खडसे व निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे हे भाजपातून राष्ट्रवादीवासी झाले आहेत. त्यामुळे त्यांना भाजपा टार्गेट करेल, असेही बोलले जाते. ही शक्याशक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीला सावध भूमिका घेणे आवश्यक ठरते. परस्परांची मते न पळविण्याचा करार काँग्रेस व राष्ट्रवादीने केल्याचे वृत्त आहे. अर्थात निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वेगळे सांगायला नको. तिकडे शिवसेनाही सर्व आमदारांवर करडी नजर ठेऊन आहे. तसा सेना हा रांगडा पक्ष आहे. युक्त्या, चलाख्यांमध्ये पक्ष कमी पडतो. त्यांना ते शिकावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती हा भाजपाचा प्लस पॉईंट आहे. असे असले, तरी या वेळचे आव्हान अधिक मोठे आहे. त्यातही यश मिळाले, तर फडणवीस यांचे राजकीय वजन आणखी वाढू शकते. शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांच्या आकलनापलीकडचे असते. राज्यसभेत सेना उमेदवार हरल्यानंतर पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक करणे, देहू कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजित पवारांबद्दल दिसलेला स्नेहभाव अशा बारीकसारीक बाबीतून अनेक संदेह निर्माण होतात. 2014 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपाला देऊ केलेला पाठिंबा, मागच्या निवडणूक निकालानंतर अजित पवार यांना सोबत घेऊन झालेला औट घटकेचा सत्ताप्रयोग हा इतिहास फार जुना नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपाचे मेतकूट तर जमणार नाही ना, अशी शंका घ्यायला काहीशी जागा आहे. प्रत्येक निवडणूक ही ‘निवडणूकच’ असते. त्यात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. एखादे मत बाद झाले, तरी त्याचा संपूर्ण निकालावर परिणाम होतो, हे उदाहरण आपण पाहिलेच आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत नेमके काय होईल, कुणाला धक्का बसेल, याची अटकळ बांधणे हवामान विभागाचा अंदाज वर्तविण्यापेक्षा अधिक अवघड आहे. तरीदेखील ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक असेल. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही उमेदवार पडला, तर त्याचा एकूण सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो.