माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे गौरवोद्गार : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता, मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाची भाई दाजिबा देसाई यांनी सुरुवात केली. हिमालयाच्या उंचीच्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यामुळे संस्था मोठी झाली. त्यामुळे गावागावात शिक्षणाची गंगा वाहू लागली. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन सुरू झालेली ही संस्था आजही त्याच विचाराने वाटचाल करीत आहे, या कार्याचे अनुकरण व्हावे, असे विचार माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता व छत्रपती शाहू प्रकाशन मंडळाच्या ‘साप्ताहिक राष्ट्रवीर’चा शताब्दी महोत्सव बुधवारी ज्योती महाविद्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सरोज एन. पाटील, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, सचिव प्रा. विक्रम पाटील, एन. बी. खांडेकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य उभे न करता रयतेचे राज्य उभे केले. शाहू महाराजांनी समाजातील अनि÷ रूढी-परंपरा बंद केल्या. दूरदृष्टी असणारा राजा कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराज. त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. महात्मा फुलेंनी बहुजनांच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या समाजालाही उपयुक्त ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ संविधान दिले नाही तर पुढील काळाचा विचार करून भाक्रा नांनगलसारख्या धरणासाठी प्रयत्न केले. धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याचे पवार यांनी सांगितले.
अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू
काही तांत्रिक कारणामुळे सीमाभागातील संस्थांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. समाज प्रबोधन करणाऱया संस्थांचे अनुदान बंद पडू देणार नाही. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र सरकारचे अधिकारी व संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक बोलाविली जाईल, तसेच कर्नाटक सरकारकडून अनुदान मिळेल, याची जबाबदारी डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडे सोपवितो, असे पवार यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षण मंडळाला महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही सरकारांचे अनुदान मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. केवळ बेळगावमधील देणगीदारांच्या मदतीने संस्था उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे तरी महाराष्ट्र सरकारने 2001 पासून बंद असलेले अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. ऍड. राजाभाऊ पाटील यांनी प्रास्ताविक करून दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. मराठी भाषिकांच्या लढय़ात पहिल्यापासून शरद पवार यांचे योगदान असून यापुढेही ते राहणार आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठीचे आमचे स्वप्न त्यांनी पूर्ण करावे, असे सांगून त्यांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला.
सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन
स्फूर्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शरद पवार यांनी भाई दाजिबा देसाई यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. संस्थेच्यावतीने शरद पवार व डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन, प्रा. डॉ. अरुण शिंदे संकलित राष्ट्रवीरमधील शामराव भोसले यांच्या अग्रलेख पुस्तकाचे प्रकाशन, साप्ताहिक राष्ट्रवीर शतकमहोत्सवी विशेषांक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. सुरेश पाटील यांनी आभार मानले.