नितीन सावंत यांचे उद्गार : नावगे येथे प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात, विविध मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /किणये
अलीकडे इंग्रजी भाषेचे स्तोम वाढत चालले आहे. समाजात वावरताना केवळ दिखाऊपणासाठी इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, खरे ज्ञान हे केवळ मातृभाषेतूनच मिळते. आपली मायबोली जगली पाहिजे, आणि गावागावातील शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मातृभाषेतून शिक्षण घेणारेच उच्चपदावर पोहोचू शकतात, असे उद्गार परभणी येथील साहित्यिक नितीन सावंत यांनी काढले. नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा रविवारी झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते या नात्याने नितीन सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, शाळेचा विकास करण्यासाठी वडीलधाऱ्यांनी नवतरुणांना सांभाळून घेऊन एकमेकांच्या सहकार्याने कार्य केले पाहिजे. आता संतांची कास आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शिक्षणाने समाज प्रगल्भ व्हायला पाहिजे. साऱ्यांनी मिळून वैचारिक विचार करणारा व चांगल्या प्रकारे जीवन जगणारा समाज घडवायला हवा. मराठी भाषा वारकऱ्यांनी सर्वाधिक जगविली आहे. त्यामुळे संतांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. गावागावांमध्ये होणारी पारायणे, दिंड्या व हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ज्ञानाचे आदानप्रदान होते. संतांनी समतेची परंपरा शिकविली आहे. त्यामुळे गावात चांगल्या विचारांचा वारसा चालवायला हवा.
पोपटाला जेवढे बोलायला शिकवितात, तेवढेच तो बोलतो. अशी पोपटपंची विद्यार्थ्यांना करायला लावू नका. सौंदर्याचा रंग हा केवळ गोरा असतो, ही समाजाची चुकीची समज आहे. अंगभर पोशाख घातल्याने सुंदरता जपली जाते. इतिहास त्याग आणि समर्पण करणाऱ्यांचा लिहिला जातो. त्यामुळे आपण आपल्या गावचे इतिहासात नाव रहावे यासाठी काम करा, असेही सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक मारुती मोटणकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश हुंबरवाडी होते. मनोहर किणेकर यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पूजन आर. एम. चौगुले यांनी केले तर सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन आर. आय. पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन अॅड. सुधीर चव्हाण, स्वामी विवेकानंद प्रतिमापूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले. धनाजी गोल्याळकर, डी. बी. पाटील, अॅड. शाम पाटील, ग्रा. पं. अध्यक्षा अर्चना चिगरे, अप्पुनी पाटील, परशराम शहापूरकर, शिल्पा कामती आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बसाप्पा गवळी यांनी प्रास्ताविक केले. या शाळेने आम्हाला चांगले शिक्षण दिल्यामुळेच आज शाळेचे बरेच माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, असे सुरेश हुंबरवाडी यांनी सांगितले. समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे, असे डी. बी. पाटील यांनी सांगितले. मराठी शाळा टिकविण्यासाठी गावागावातून प्रयत्न झाला पाहिजे, असे मनोगत मनोहर किणेकर व शिवाजी सुंठकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शाळेमध्ये ज्या ज्या शिक्षकांनी सेवा बजावली आहे, अशा माजी सर्व शिक्षकांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गावातील आजी व माजी जवानांच्यावतीने दुपारच्या स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मृणाल हेब्बाळकर, मारुती हुरकाडली, सातेरी कामती, ग्रा. पं. उपाध्यक्ष भरमाण्णा पाटील आदी उपस्थित होते.
हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी य् ाांच्या हसवणूक कार्यक्रमाने रंगत
दुपारच्या सत्रात हास्यसम्राट झी मराठी टीव्ही फेम अजितकुमार कोष्टी यांचा ‘हसवणूक’ हा कार्यक्रम झाला. गण्याचे विविध विनोदी किस्से सांगून रसिकांना खळखळून हसविले. तसेच कोरोनामध्ये पुरुषांचे झालेले हाल, घरातून बाहेर पडताना पाळावयाची नियमावली यावर विनोद सादर केले. नवराबायकोचे भांडण तसेच विविध विषयांवर विनोदी किस्से सांगितले. प्रत्येक गोष्टीत विनोद असतो. विनोदी पद्धतीने जगायला लागलो की जगणे अगदी सुखकर होते. हसल्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना विसरायला होतात, असे सांगितले. अजितकुमार कोष्टी यांचा लवकरच ‘रपाटा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यांनी हसवणूक या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह कोल्हापूर व बेळगाव परिसरातील रसिकांवर आपली हास्याची जादू कायम ठेवली आहे. त्याबद्दल त्यांचा नावगेत विशेष सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन विनायक पाटील यांनी केले. साहित्यिक नितीन सावंत, हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांचा परिचय आण्णाप्पा पाटील यांनी करून दिला. मुख्याध्यापक आर. पी. सुतार, एसडीएमसी अध्यक्ष चांगाप्पा येळ्ळूरकर, गावातील पंचमंडळी, आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा तसेच आजी-माजी सैनिकांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्याचे उद्घाटन रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच लोकगीते, लावणी आदींवर नृत्य सादर करून वाहवा मिळविली.