अभिराम भडकमकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
साहित्यकांनी आपला भोवताल हा समकालीन शब्दात बांधून ठेवून संकुचित केला आहे. साहित्यकांनी साहित्यबाह्याला बळी पडू नये. आत्मसन्मानाने आपल्या साहित्यकृतीबद्दल प्रामाणिक राहिले पाहिजे. जेव्हा साहित्यकि आपल्या अंतःस्वर व पिंडावर प्रामाणिक राहतो तेव्हा तो वाचकाला व साहित्याला समृद्ध करतो. साहित्य व्यापकरित्या पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या गोवा मराठी अकादमीचा सहाव्या वर्धापनदिन समारंभ सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी व्यासपीठा?वर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, जनार्दन वेर्लेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कुठलीही भाषा ही केवळ भाषा संवादासापुरती नसते तर ते पिढय़ांचे संचित असते. त्यामुळे भाषा टिकणे महत्वाचे आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून भाषा रुळली पाहिजे असे मत अभिराम यांनी यावेळी व्यक्त केले.
गोवा मराठी अकादमी ही उत्सवी कार्य करत नाही. मराठीच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे. गोव्यात मराठी टिकावी यासाठी प्रयत्न करत आहे. मराठी ही आपल्यासाठी अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एक रसायन आहे. गोव्याचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आहे. हा इतिहास टिकावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच शंकर रामाणी यांच्यावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांनी दिली.
यावेळी दयाराम पाडलोस्कर, राजू नाईक, समृद्धी केरकर, परेश प्रभू, उदय ताम्हणकर, विभा लाड, शुभदा च्यारी, या वर्षाचे अकादमीचे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच कथा व कविता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय मराठी सांस्कृतिक केंद्र प्रमुख, तालुका प्रभाग प्रमुख, आणि कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
महत्वाचे म्हणजे गोवा मराठी अकादमीतर्फे दत्ता (भाई)मोये यांना शशिकांत नार्वेकर मराठी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या समारंभात ’प्रेम वरदान’ हा नाटय़संगीताचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.
यात अनुष्का थळी, सूरज शेटगावकर, शारदा शेटकर व दिव्या गावणेकर यांचा सहभाग होता. या कलाकारांनी सवेश, साभिनय नाटय़गीत सादरीकरण केले. त्यांना ऑर्गनवर शिवानंद दाभोलकर आणि तबल्यावर नितीन कोरगावकर यांनी संगीतसाथ केली.