पालकमंत्री दीपक केसरकर : सत्ता गेल्याची उद्धव ठाकरेंना पोटदुखी
कोल्हापूर / प्रतिनिधी
गायरान अतिक्रमण हा विषय संवेदनशील आहे. राज्य सरकारची भूमिका जनतेबरोबरच आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. तरीही यातून गरीबांना सुट देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्याची पोटदुखी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीपूर्वी त्यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : दोन महिन्यांत शहराचा कायापालट करा
पालकमंत्री म्हणाले, गायरानप्रश्नी सुट कशा पध्दतीने देता येईल याची मार्गदर्शक तत्वे सरकारने केली आहेत. जे लोक अल्पभूधारक आहेत, न्यायालयाच्या निर्णयानुसार जे लोक पात्र होतात, अशा गरीबांना सुट देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये जर कोणी मोठा वाडा बांधला असेल व तो कायम व्हावा, अशी त्यांची इच्छा असेल तर ते होणार नाही.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेबाबात विचारले असता केसरकर म्हणाले, उध्दव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी असून सत्ता गेल्याचे त्यांना दुःखं आहे. या सरकारची ताकद कमी झाली की वाढली हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल. एका क्लिकवर आम्ही शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा केले. तुमची सत्ता असताना विधानसभेत सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नाही, इतके तुम्ही लाचार व दुबळे झाला होता. तुमचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत आहेत. त्यावेळी महाराष्ट्र दुबळा झाला हे दिसले नाही का? आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका सुरु केली आहे. तुमच्याकडे बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला कळवली आहे.
संजय राऊत यांची सुरक्षा सरकारने काढली नाही
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतली याबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, कोणाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत नाही, तर त्यासाठी असलेली समिती हा निर्णय घेते. तसेच ज्यांच्यापासून धोका होता, ते सर्वजण आता त्यांच्याबरोबरच आहेत.
अंधारेंबद्दल काय बोलायचे ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तलवार पेलणार नाही, अशा शब्दात टीका करणाऱया सुषमा अंधारे यांच्याबद्दल काय बोलायचे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा आहे. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल तर मुंबई महापालिकेत त्यांचा पाठींबा का घेतला? असा सवालही त्यांनी केला.