अध्याय बाविसावा
उद्धवाने देवाना विचारले, हे कृष्णा! प्रकृती आणि पुरुष वेगवेगळे आहेत हे समजले पण दिसताना तर ती एकमेकात इतकी मिसळून गेली आहेत की, ती वेगवेगळी आहेत असे वाटतच नाही. प्रकृती जड म्हणजे निर्जीव आहे तर पुरुष चैतन्यरूपी आहे पण ती एकमेकांपासून वेगळी कशी, हे समजत नाही. जगामध्ये पुरुषाच्या संगतीने प्रकृतीचाही भास होतो. पुरुषाशिवाय प्रकृती नजरेलाही दिसत नाही. प्रकृती-पुरुषांचे कोडे तुझ्याशिवाय कोण उलगडून सांगणार? तू हे सांगू शकतोस कारण तू या दोघांचे वेगवेगळे स्वरूप जाणून आहेस आणि म्हणूनच तू दोघांच्याकडे साक्षी म्हणून पाहू शकतोस. उद्धवाची विनंती ऐकून भगवंतांनी प्रकृति-पुरुषांचे निरूपण सविस्तर सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, उद्धवा! नीट लक्ष दे. प्रकृती आणि पुरूष म्हणजेच शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये फार फरक आहे. प्रकृतीच्या गुणांच्या उदेकाने सृष्टी उत्पन्न होते म्हणून ती विकारांनी युक्त आहे तर पुरुष निर्गुण असल्याने निर्विकार असतो म्हणून प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही कायमच दिवस रात्रीप्रमाणे वेगवेगळी आहेत. दिवस अस्ताला गेला की, परिपूर्ण अंधकाराने युक्त अशी रात्र नक्षत्रे आणि सारे ग्रह ह्यांच्या समुदायासह मोठय़ा उत्साहाने प्रकट होते. जोपर्यंत पुरुष जागृत असतो तोपर्यंत प्रकृतीचे फारसे काही चालत नाही पण पुरुषाचे भान लुप्त झाले की, प्रकृती कार्यासह सत्त्वादि गुण घेऊन पुढे येते.
ज्ञान व अज्ञान यांनी परिपूर्ण होऊन प्रबळ होते. ह्यात मुख्यत्वेकरून देह हा प्रकृतीचा मोठा किल्ला होय. त्यात मोठा योद्धा असलेला अहंकार किल्लेदार म्हणून वावरत असतो. तोच प्रकृतीचा जिवलग व विश्वासू आहे. प्रकृतीला त्याचाच सर्वस्वी विश्वास वाटतो. सर्व जबाबदारी तोच आपल्या मस्तकावर घेतो. किंबहुना देहरूपी किल्यावर त्याचाच कब्जा असतो असे समज या देहरूपी किल्ल्यामध्ये तीन गुण व अहंकारादि विकार यांची सामुग्री भरलेली असते, तीच प्रकृती असून तिला देहाचा आकार प्राप्त होतो. मृगजळातील नदी दुरून मोठय़ा प्रवाहाने वहात असलेली दिसते, त्याप्रमाणे प्रकृती हीच स्वतः नाना स्वरूपांनी भासमान होत असते. अशा प्रकारे हा प्रकृतीचा किल्ला मोठा भयंकर असून त्यात अहंकार कोणकोणत्या विकारांची सामुग्री आणून घालतो, तेही खुलासेवार सांगतो. उद्धवा! माझी माया हीच आपण होऊन आपल्या स्वरूपाने त्रिगुणात्मक झालेली आहे. पण ते तीनही गुण अभिमानाने आपल्या सत्तेने स्वतःच्या ताब्यात ठेवले आहेत. त्याच देहरूप किल्ल्यासभोवार त्या तीन गुणांचा खंदक खणून अभिमान त्यांच्यावर राज्य करत असतो. त्या किल्ल्याचे संरक्षण त्रिपुटीच करत असते. त्या देहरूपी किल्ल्याला तीन मार्ग असतात, त्यांपैकी दोन आडमार्ग असून एक मार्ग मात्र सरळ आहे त्या मार्गामध्ये अशी व्यवस्था केलेली असते की, दहा ठिकाणी युद्धाकरिता सैन्य उभे केलेले असते आणि ते मार्ग चारी बाजूंनी रोखलेले असतात. देहरूप किल्ल्यावरील सामुग्री मोठी कडक आहे.
अभिमान प्रकृतीच्या संमतीमुळे ठाणे देऊन बसला आहे. तो चोरद्वारातून पहात असतो आणि कामक्रोधाची खिडकी हळूच उघडून एकाएकी घाला घालतो.
कामक्रोधाची दहशत घेऊन तपस्वी लोक तर सैरावैरा पळत सुटतात, लोभरूप तोफखाना सुरू होऊन धाड धाड आवाज होत असतात, त्यामुळे चोहोकडे अज्ञानाचा धूरच माजून राहतो. महामोहाने दिशा धुंद होऊन मागचे पुढचे काहीच दिसत नाही. या किल्ल्याच्या सभोवार नऊ दारदाऱया असतात, त्या नऊ दारांमध्ये नऊ तोफा तयार असतात आणि त्यातून विषय सारखा भडिमार करीत असतात. देहाभिमानाचा मुख्य चालक म्हणजे मन. त्याचा मारा महाभयंकर असल्याने, कशानेच मागे न हटता सर्व किल्ल्याचा बंदोबस्त आपल्या ताब्यात ठेवते. म्हणून शत्रूही एकदम चढाई करून झपाटय़ाने पुढे घुसतात, तो त्या दहाव्या द्वाराचा मार्गही कपाट लावून अगदी पक्का बुजविलेला असतो. अशा प्रकारे मन हे जातीनिशी हा देहरूप किल्ला राखून असते.
क्रमशः