ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पन्नास आमदारांनी शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड झाली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. आमच्या मागण्यांवर वेळीच निर्णय घेतला असता तर हे झालं नसतं अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. आज गोव्याहून मुंबईला ते येणार आहेत. विमानतळावर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला याचे आम्हाला दु:ख आहे. त्याचा आनंद आम्हाला झाला नाही. आमच्या शिवसेनेच्या मतदार संघातील अडचणी ज्या होत्या त्या आमदारांनी मांडल्या असेही ते म्हणाले. यावेळी केसरकरांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.
केसरकर म्हणाले,उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलेब्रेशन केलेलं नाही. त्यांना दुखवावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही सांगितलेली भूमिका त्यांनी एेकली नाही आणि शेवटी हि स्थिती उध्दभवली आहे. संजय राऊत जेवढे कमी बोलतील तेवढं चांगलं आहे.महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार शिंदे यांना दिले असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तुम्ही महाविकास आघाडी सोबतची साथ सोडा आपण भाजप सोबत जाऊ अशी वेळोवेळी विनंती आपण उद्धव ठाकरे यांना केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली नाही म्हणून आपल्याला शिवसेनेची साथ सोडून बंडखोरी करावी लागली. शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने केलं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. मात्र वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. राज्यसभा व विधान परिषदा निवडणुकीत या सहयोगी पक्षामुळे आमच्या उमेदवारांना पराभवाचा फटका बसला असा आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केंद्र राज्यात आग लावली
शिवसेना नेते संजय राऊत सकाळी उठून पत्रकार परिषद घ्यायचे व केंद्र विरोधी वक्तव्य करायचे त्यामुळे राज्य व केंद्रात तेढ निर्माण होऊन दुरावा निर्माण झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सहयोगी पक्षांमुळे राज्यसभा व विधान परिषदेत पराभव
सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमुळे शिवसेनेचे अतोनात नुकसान झालं. नेहमीच या सहयोगी पक्षाने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट आपण व शिवसेना आमदारांनी वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र पक्ष नेतृत्व आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आम्हाला बंडखोरी कडून पक्षातून बाहेर पडावं लागलं. शिवसेना व उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी कोणताही वाद नसून पक्षाच्या हितासाठी आपण बाहेर पडल्याचे केसरकरांनी स्पष्ट केलं.