ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसह गुवाहाटी दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर शिंदे यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरूनच आम्ही गुवाहाटीला जात आहोत. तसेच कामाख्या देवीचा नवस आम्ही आज फेडणार आहोत. यावेळी देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी साकडं घालणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. तेव्हा आम्ही गडबडीत होतो त्यामुळे महाराष्ट्रात परत आलो. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याप्रमाणे आम्ही जात आहोत. कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. त्यामध्ये कोणाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही. आमची श्रद्धा आहे. भक्तीभावाने सर्व लोकांची इच्छा आहे, तिकडे परत जायची आणि जात आहोत.
अधिक वाचा : शिंदे गट गुवाहाटी दौऱ्यावर, नाराजीमुळे काही आमदारांची दांडी?
राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या. जनता सुखी होऊ दे. राज्यावरील संकट दूर होऊ दे, यासाठीच आम्ही जात आहोत. आमचा दुसरा काही अजेंडा नाही आहे. जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल, सुख, समृद्धी, आनंद असू दे. राज्यातील जनतेला सुखी करावे, या भावनेने आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत. दलित पँथर गटाने आम्हाला समर्थन दिले आहे. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे, असेही ते म्हणाले.