ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आहे. सिनेनट उघड उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनतर आपल्यासोबत ४६ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षासंबंधीचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच बंडखोरांना पुन्हा पक्षात घेऊ नये असाही ठराव झाल्याचे समजत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना- भाजपा युती तसेच मुख्यमंत्रिपदाविषयी महत्त्वाचे भाष्य केले आहे. भाजपा-शिवसेना यांच्यातील युती कायम राहिली असती तसेच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या कराराची अंमलबजावणी झाली असती तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच होते, असे राऊत म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
“भाजपाने शब्द पाळला असता. तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. पण भाजपाने बेईमानी केली. म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्याच भाजपासोबत आज एकनाथ शिंदे जायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांपूर्वी एका विशिष्ट परिस्थितीत मुख्यमंत्री झाले. तीन भिन्न विचारधारेचे पक्ष सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले,” असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला एक नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत सहा ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना सोडून कोणताही राजकीय पक्ष वापरू शकत नाही, असा एक ठराव या बैठकीत समंत करण्यात आला. तसेच सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.