अंकुश कोकरे / कास :
गेल्या पंधरा दिवसांच्या नाटय़मय घडामोडीनंतर अखेर अनपेक्षरित्या कोयनेचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. विश्वासदर्शक ठरावाची अग्नीपरिक्षाही पास झाल्याने जन्मभूमीचा कोंडलेला श्वास रिकामा झाल्याने कास, बामणोली, तापोळा, कोयना, सोळसी, कांदाटी खोऱ्यातील नागरीकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गुलालाची उधळण, गुढय़ा उभारणे फटाक्यांची आतषबाजी ग्राम देवीच्या मंदीरात धुपारती सोबतच जयघोष अशा प्रकारे सर्वत्र एकच जल्लोष पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जन्मभूमीला आस लागून राहीली असून, आता कर्मभूमीसोबतच जन्मभूमीचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
धक्कादायक रित्या राजकीय घडामोडी घडुनही कोणताही राजकीय वसा नसतानाही आपल्या आपार कष्टाच्या जोरावर अतिदुर्गम भागातील शेतकऱ्याचा मुलगा राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो, हे शिंदेंनी दाखवून दिले. संघर्षमय जीवन जगताना आपली कर्मभूमी असलेल्या ठाणे जिल्हयाचा सर्वांगीण विकास साधताना अनेक पदांवर काम करत मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली ही कौतुकास्पद बाब असून आपली जन्मभूमीशी जोडलेली नाळ शेतीतील आवड नातेसंबधासोबतच जोडलेले प्रेमसंबध अजही विभागाच्या विकासाला दिलेले झुकते माप शिवसैनिकांवर केलेले आपार प्रेम घडविलेले शिवसैनिक लक्षात घेता आता जन्मभूमीच्याही विकासाला गती यावी, येथील शेती रोजगार रस्ते शाळा दवाखाना पर्यटन विकास याला आलेली मरगळ झटकुन गती मिळावी दुर्गमचा सुगम भाग म्हणून ओळख व्हावी, येथील रखडलेल्या रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन पर्यटन प्रकल्प त्वरित मार्गी लावून स्वयंरोजगाराच्या निर्मितीस चालाना मिळावी अशा अपेक्षा तरूण वर्गातून व्यक्त होत आहेत.
शिंदे यांनी भागातील अनेकांना मुंबई, ठाण्यात शिवसेनेत मोठय़ापदांवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनाही आपल्या जन्मभूमीच्या विकासाची आस लागून राहीली आहे. त्यांची एकत्र मोट बांधून या भागाच्या विकासाचं व्हिजन तयार व्हावं. जास्तीत जास्त स्थानिक भुमीपुत्रांसोबतच जन्मभूमीच्या विकासाची दारे खुली होऊन आपल्याच भूमीत प्रगती साधता यावी, अशी मोठी अपेक्षा पुढे येऊ लागली आहे.
चोहोबाजुनी निसर्ग संपदेने नटलेल्या जलाशयाच्या काठी त्रिवेणी संगमाशेजारी मुख्यमंत्र्यांचं छोटंस गाव आाहे. आपल्या गावी वर्षातून चार-दोन वेळा येऊन छोटया मोठया कार्यक्रमात हजेरी लावून शेतीच्या कामांचा आनंद घेण्याची संधीही ते सोडत नाहीत. कांदाटी, सोळसी, कोयना, तापोळा, बामणोली, कास निसर्ग संपदेने नटलेला विभाग असून येथे पर्यटन विकासासाठी मोठा वाव असल्याने पर्यटन विकासाला आधिक गती यावी. यामध्ये महाबळेश्वर-कास या राजमार्गाच्या वाहतुकीस गती येण्यासाठी गाळदेवच्या पुढील खिंडीतील रस्ता त्वरीत डांबरीकरण व्हावा, कास पठारच्या विकासासोबतच नैसर्गीक रंगीबेरंगी फुलांनी बहरणाऱ्या तांबी जुंगटी पठारला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून पर्यटन विकास व्हावा. भांबवली वजराई धबधब्याच्या पर्यटन विकासासोबतच केळवली सांडवली कारगाव व मुनावळे येथील धबधब्यांना पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, बामणोली तापोळा मुनावळे शेंबडी येथील बोट क्लबचा विकास व्हावा, कास ते बामणोली तेटली या मार्गाच्या रुंदीकरणासोबतच कोयना नदी वरील काचेची प्रेक्षागैलरी असणाऱ्या पुलाच्या निर्मितीच्या कामाला गती यावी, ऊत्तेश्वराच्या डोंगरावर अद्याप बारा वाडय़ावस्त्या मुख्य रस्त्यांनी दळणवळणाशी जोडल्या गेल्या नसून अद्याप त्यांच्या नशीबी मैलानमैल पायपीटच आहे, त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटावा
शेतीच्या योजनांची अंमलबजावणी होऊन शेतकरी समृद्ध होऊन जवळच्या बाजरपेठेची निर्मिती व्हावी, वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण मिळावे, अशा अपेक्षा स्थानिक व्यक्त करत असून कर्मभूमीसोबतच आता जन्मभूमीच्या विकासालाही न्याय मिळेल, अशी भावाना जनतेतून व्यक्त होत असून मुख्यमंत्र्याच्या जय्यत स्वागताची आस दरे गावासह भागाला लागली आहे.