गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे आवाहन : दिल्लीवाल्यांवर अवलंबित उमेदवारांना घरचा रस्ता दाखवा
प्रतिनिधी /मडगाव
पंचायतीच्या निवडणुकीत जे स्वाभिमानी गोमंतकीय उमेदवार आपला हायकमांड गोव्यात आहे असे सांगतात त्यांना मतदारांनी निवडून द्यावे आणि जे दिल्लीवाल्यांवर अवलंबून आहेत अशा उमेदवारांना घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.
रविवारी फातोर्डात फळझाडांची रोपटी वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. येथील सत्ताधारी व अन्य पक्ष दिल्लीवासियांवर अवलंबून आहेत. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय त्यांचे पान हलत नाही. गोमंतकीयांना काय व कसा विकास पाहिजे हे गोमंतकीयांनी ठरवायचे असते. त्यासाठी आम्हाला दिल्लीवासियांवर अवलंबून राहण्याची गरज नसून अशा अवलंबित पक्षांच्या उमेदवारांना पंचायतीच्या निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे, असे सरदेसाई म्हणाले.
घटनेच्या 75 व्या दुरूस्तीखाली पंचायतीसारख्या स्वायत्त स्वराज संस्थांना कित्येक अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. ते त्यांना मिळण्याची गरज आहे. मात्र सरकार त्यांना ते देत नाही. पंचायती, पालिका, जिल्हा पंचायतींकडून फक्त गटारांची साफसफाई करून घेण्यात येत आहे, हे योग्य नव्हे. आपण एकच आमदार या स्वायत्त स्वराज संस्थांना अधिकार देण्याची मागणी करत असून आप व इतर पक्षांचे आमदार यावर चुप्पी बाळगून का आहेत, असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला.
अधिकार द्यायचे नसल्यास स्वायत्त स्वराज संस्था बरखास्त करा
देशात त्रिस्तरीय लोकशाही आहे. त्यानुसार स्वायत्त स्वराज संस्थांना त्यांचे अधिकार मिळायला हवेत. त्याशिवाय पंचायतीच्या निवडणुका घेणे फार्स ठरणार. अन्यथा सरकारने या स्वायत्त स्वराज संस्था बरखास्त करून टाकाव्यात, असे सरदेसाई म्हणाले. आपला मतदारसंघ पालिका क्षेत्रात येतो. आपण कधी पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही, कारण लोकांना जो विकास पाहिजे तो नगरसेवक, पंचायत सदस्यांनी लोकांना विश्वासात घेऊन करायचा असतो. त्यामुळे ग्रामसभांना तेवढेच महत्त्व असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जोपर्यंत पंचायती, पालिकांना घटनेच्या 75 व्या दुरुस्तीनुसार अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत लोकांच्या संमतीने विकास शक्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.