मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य : फुटिरवादी शक्तींना योग्य प्रत्युत्तर मिळणार
वृत्तसंस्था/ जम्मू
आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवरून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आहे.आम्ही लवकरच निवडणूक घेणार आहोत. कुठलीच शक्ती निवडणुकींना प्रभावित करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक फुटिरवादी शक्तींना योग्य प्रत्युत्तर देतील असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्व राजकीय पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये लवकर विधानसभा निवडणूक व्हावी या भूमिकेचे आहेत. आता केंद्रशासित प्रदेशाला निवडून आलेले सरकार देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या होत्या. मागील अनेक दशकांमध्ये जे घडले नाही, ते मागील निवडणुकीत लोकांनी करून दाखविल्याचे उद्गार राजीव कुमार यांनी काढले आहेत.
निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय पथक 2 दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर होते. या पथकाची गुरुवारी प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत राजकीय पक्षांनी लवकर निवडणूक आयोजित करण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेशात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.
राजकीय पक्षांच्या मागण्या
सर्वांना समान स्वरुपात सरकार निवडण्याचा अधिकार मिळावा
पक्षांना सभा, निदर्शने करण्याची समान संधी मिळावी
सर्व नेत्यांना पुरेशी अणि समान सुरक्षा सुरक्षा प्राप्त व्हावी
मतदान केंद्र 2 किलोमीटरच्या कक्षेत असावे
राज्यात लवकर व्हावी निवडणूक
निवडणूक करविण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी अधिसूचना लवकरच जारी होईल अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्य मुदतीत (30 सप्टेंबरपर्यंत) निवडणूक घेणे आयोगाची जबाबदारी असल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष निवडणूक व्हावी म्हणून आयोगावर दबाव टाकतील, परंतु सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यावरून साशंक असू शकतात असे वक्तव्य पीडीपी नेते इल्तिजा मुफ्ती यांनी केले आहे. आम्ही आयोगाला लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत केंद्रशासित प्रदेशात निवडणूक व्हावी असे भाजप नेते आर.एस. पठानिया यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही बहरायला हवी आणि लवकर निवडणूक व्हावी. जम्मू-काश्मीरचे लोक अनेक वर्षांपासून निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत असे काँग्रेस नेते जी.एन. मोंगा यांनी नमूद पेले आहे