शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. आता निवडणुकीसाठी 30 ते 40 हजार कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहे. हा खर्च करून भ्रष्ट लोकांनाच पुन्हा आम्ही निवडून द्यायचे काय? त्यापेक्षा निवडणुकाच किमान तीन वर्षे पुढे ढकला आणि राष्ट्रपती राजवट लागू करून राज्य चालवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर पाचच वर्षांत अमाप पैसा जमवतात. त्यानंतर हा पैसा निवडणुकीच्या काळात खर्च करतात. आता विविध ठिकाणी त्याचे वाटप सुरू झाले आहे. मात्र जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे उलटली तरी शेतकरी मात्र आहे त्या स्थितीतच आपला उदरनिर्वाह करत आहे. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोग लागू करावा, यासाठी अनेक वर्षे लढा दिला आहे. तो आयोग लागू करण्यास सरकार तयार नाही. आता निवडणुका जवळ आल्यानंतर मतदारांना आमिषे दाखवून सत्ता बळकावली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका, तीन वर्षे निवडणूक पुढे ढकला. त्यामुळे आता ज्यांनी विविध प्रकारच्या वस्तू वाटल्या आहेत त्यांना चांगलाच दणका बसेल, असे या निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश नाईक, सरोजिनी डांगे, पार्वती मुतवाड, रेखा शहापूरकर, शाम बसरीकट्टी, गोपाळ सोमनाचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.