निवडणुकांची पुर्वतयारी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश; पुढील आठवडय़ात ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक कर्मचाऱयांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना; प्रभाग रचनेसह अंतिम मतदार यादी तयार; जिह्यात 474 ग्रामपंचायतीमध्ये उडणार राजकीय धुरळा
कृष्णात चौगले कोल्हापूर
माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱया जिह्यातील 474 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेसह मतदार यादी निश्चित झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक कर्मचाऱयांच्या प्रशिक्षणासह आवश्यक पूर्वतयारी करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱयांची नेमणूक करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने शासनाच्या मुख्य सचिवांसह सर्व जिह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱयांना दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवडय़ात जिह्यासह राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी परिपूर्ण दक्षता घ्यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह इतर साहित्याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करावेत. मतदान केंद्राची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक सोयी, सुविधा असल्याबाबत खात्री करावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करून आवश्यक ती उपाययोजना करावी. नामनिर्देशनपत्रे, घोषणापत्रासह इतर कागदपत्रे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या वेबसाईवर पाठवावी लागतात. त्याबाबत संबंधित कर्मचाऱयांनी माहिती घेऊन सदरची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी आदी सूचना आयोगाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबवून मतदानाच्या तारखेपूर्वी मतदारांना व्होटर स्लीपचे वाटप करावे असे निर्देशही आयोगाने जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार असून ज्या जिह्यातील 50 टक्के केवा त्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूका आहेत, त्या संपूर्ण जिह्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्यामुळे पुढील आठवडय़ात ग्रा.पं.निवडणुकांची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायतीची पहिली सभा होईपर्यंत ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. जिह्यात एकूण 1025 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 अखेर 475 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामध्ये ऑक्टोबरमध्ये मुदत संपलेल्या 1 ग्रा.पं.ची निवडणूक झाली असून अद्याप नोव्हेंबरमधील 429 आणि डिसेंबरमध्ये कालावधी संपणाऱया 45 ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक होणार आहे.
टप्प्याटप्पाने होणार प्रशासकांची नियुक्ती
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या 474 ग्रामपंचायतींवर टप्प्याटप्प्याने प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी, शिक्षण, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, सांख्यिकी विभागातील विस्तार अधिकारी अथवा समकक्ष अधिकारी, शाखा अभियंता आदी अधिकाऱयांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामसेवकांना प्रशासक पदावर नियुक्त केले जाणार नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रशासकांची नियुक्ती करणार आहेत.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
तालुका नोव्हेंबर डिसेंबर
करवीर 49 4
गडहिंग्लज 31 3
पन्हाळा 45 5
कागल 24 2
चंदगड 26 14
राधानगरी 56 10
गगनबावडा 20 1
शाहूवाडी 48 0
शिरोळ 16 1
भुदरगड 42 2
आजरा 36 0
हातकणंगले 36 3
एकूण 429 45