दिवसभर तिळामळ-कुडचडे येथे पडून : कदंबचे ‘आरोग्य’ दिवसेंदिवस बिघडतेच
प्रतिनिधी /पणजी
इतके दिवस कदंब महामंडळाच्या जुन्या डिझेल बसगाडय़ा बंद पडत होत्या, परंतु आता नव्याने आणलेली इलेक्ट्रिक कदंब बसगाडी कुडचडे येथे बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याचे समोर आले आहे. शिवाय या बंद पडलेल्या गाडीमुळे इलेक्ट्रिक बसबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. तसेच कदंबच्या बसगाडय़ांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुडचडे – तिळामळ येथे कदंबची इलेक्ट्रिक बस सकाळीच बंद पडली. सायंकाळ झाली तरी ती बस तिथेच पडून राहिल्याने कदंब महामंडळास त्या बसबाबत जागच आली नसल्याचे समोर आले आहे. त्या बसमधील प्रवाशांना इतर वाहनांतून जाण्याची पाळी आली. ती बस बंद पडल्यानंतर पुन्हा तातडीने दुरुस्त करुन सुरु करण्यासाठी महामंडळाने कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसून आले.
कदंबच्या डिझेल बसगाडय़ा बंद पडतात म्हणून मोडीत काढून नवीन इलेक्ट्रिक बसगाडय़ा घेण्याचा इरादा महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला होता. परंतु इलेक्ट्रिक बसगाडी देखील डिझेल गाडीसारखी बंद पडू लागली तर काय करायचे? असा प्रश्न महामंडळासमोर उभा ठाकला आहे. इलेक्ट्रिक बसगाडी का बंद पडली याची चौकशी होणे गरजेचे असून त्याचे कारण जनतेसमोर येणे आवश्यक आहे. ती गाडी पुरेशी भारीत (चार्ज) करण्यात आली नव्हती काय? किंवा तिचे भारीत अचानक संपले की काय? याचाही उलगडा झाला पाहिजे. अशा कदंबच्या बसगाडय़ा जर वाटेतच बंद पडू लागल्या तर त्याचा फटका महामंडळासकट प्रवाशांनाही बसणार आहे. शिवाय महामंडळाची विश्वासार्हता देखील धोक्यात येणार असल्याची चिन्हे आहेत.