हेस्कॉमचा सावळा गोंधळ उघड : नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया, गरज नसताना विजेची नासाडी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी विद्युत दिवे सुरूच होते. यामुळे हेस्कॉम खात्याचा सावळा गोंधळ चव्हाटय़ावर आला. सकाळी विद्युत दिवे चालू ठेवून जो विजेचा अपव्यय केला. या नुकसानीला जबाबदार कोण? असेही संतापजनक प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.
हेस्कॉम खात्याकडून सकाळी कधी 10 पर्यंत तर कधी संपूर्ण दिवसभर रस्त्यावरील विद्युत दिवे सुरू राहतात. यापुढे हेस्कॉम खात्याला दिवसाही रात्र असल्याचा भास होतो की काय, अशाही प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी जर महिन्याच्या युनिटप्रमाणे जादा वीज वापरली तर त्यांच्याकडून बिलामध्ये वाढीव रक्कम दंडाच्या रुपाने भरणा करून घेतली जाते. परंतु याठिकाणी चक्क हेस्कॉम खातेच दिवसाही जरुर नसताना विजेचा दुरुपयोग करून विजेची नासाडी करते, यांना दंड कोण लावणार? अशाही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
एखाद्या सर्वसामान्य नागरिकांकडून दरमहा बिल भरणा करण्यास विलंब झाला तर अधिकारी आपल्या कर्मचाऱयांकरवी दंड किंवा वीजपुरवठा तात्काळ बंद करतात. तेव्हा मात्र यांना हेस्कॉम खात्याच्या विजेची किंमत कळते. परंतु उजाडल्यानंतरही रस्त्यावरील विद्युत दिवे सुरू राहणे ही हेस्कॉमची नेहमीचीच बाब झाली आहे. तेव्हा गरज नसताना दिवसाही जेव्हा विजेची नासाडी खुद्द हेस्कॉम खात्याकडूनच होते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
वीज- पाणी जपून वापरा घोषवाक्ये गुलदस्त्यात
आपण नेहमी वृत्तपत्रांतून वाचत असतो वीज जपून वापरा, पाणी जपून वापरा. परंतु वास्तवात ही घोषवाक्ये गुलदस्त्यात जमा होताना दिसत आहेत. कारण काही वेळेस संध्याकाळीसुद्धा अंधार होण्याआधीच रस्त्यावरील दिवे सुरू ठेवले जातात. सकाळी उजाडल्यानंतरही विद्युत दिवे सुरूच राहतात. यामुळे या घोषवाक्याचे अवलोकन कोण करणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.