दगडी कोळशाअभावी एक चतुर्थांश वीजनिर्मिती केंदे बंद, कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारची धडपड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कडक उन्हाळय़ाने लोकांची ‘अग्निपरीक्षा’ घेण्यास सुरुवात केली असतानाच देशात वीजसंकटही तीव्र होत चालले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत कडक उन्हापासून दिलासा मिळणार नाही. साहजिकच एकीकडे तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच विजेअभावी देशवासियांची होरपळ वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी वाढत आहे. अशा स्थितीत देशातील एक चतुर्थांश म्हणजे 25 टक्के वीजप्रकल्प कोळशाच्या पुरवठय़ाअभावी बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी, 16 राज्यांमध्ये दहा-दहा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
सरकारी नोंदीनुसार देशभरात 10,000 मेगावॅट म्हणजेच 15 कोटी युनिट्सची वीजकपात केली जात असली तरी प्रत्यक्षात विजेचा तुटवडा त्याहून अधिक आहे. देशातील एकूण 173 पॉवर प्लांटपैकी 106 प्लांट्समध्ये 0 ते 25 टक्के कोळसा आहे. कोळसा प्रकल्प कोळशाच्या साठय़ानुसार वीजनिर्मितीचे वेळापत्रक तयार करतात. साठा भरल्यावर उत्पादन प्रक्रिया सुरू होते. मात्र, काही प्रकल्पांमध्ये वेळेत कोळशाचा पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम झालेला दिसून येतो.
रेल्वे मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलत दगडी कोळशाची वाहतूक करणाऱया रेल्वेंसाठी रेल्वेमार्ग मोकळा करून देताना काही पॅसेंजर रेल्वेगाडय़ा रद्द केल्या आहेत. रेल्वेने पॉवर प्लांटला कोळशाचा जलद पुरवठा करण्यासाठी एकूण 42 गाडय़ा अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे कोळसा वाहून नेणाऱया मालगाडय़ा निर्धारित स्थानकांवर वेळेवर पोहोचू शकतील. या निर्णयानंतर आठवडाभरात कोळशाच्या पुरवठय़ात 10 टक्के वाढ झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे. कोळसा खाणीपासून प्लांटपर्यंत मालगाडीने लागणारा वेळ 12 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. प्रवासी गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताच सेवा पुन्हा सुरू केल्या जातील, असे रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
दैनंदिन कोळसा लोडिंगमध्ये वाढ
तात्पुरत्या रद्द केलेल्या 42 गाडय़ांमध्ये लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांच्या 670 फेऱयांचा समावेश आहे. यासोबतच, रेल्वेने कोळसा रेकचे सरासरी दैनंदिन लोडिंग 400 पेक्षा जास्त केले आहे. हा आकडा गेल्या 5 वर्षांतील उच्चांक आहे. कोळशाची सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे दररोज 415 कोळसा रेक उचलत आहे. यातील प्रत्येक कोळसा रेकमध्ये 3,500 टन कोळसा आहे.
अनेक शहरांमध्ये पारा 45 वर
हवामान खात्याच्या माहितीनुसार दिल्लीत गेल्या 72 वर्षात दुसऱयांदा एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. या महिन्यात मासिक कमाल सरासरी तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. याशिवाय मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह 18 राज्यांतील 20 हून अधिक शहरांमध्ये पारा 45 अंशांच्या वर नोंदला गेला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज 46 अंशांसह अव्वल स्थानावर आहे.
दिल्लीतही वीजकपात
वीजकपातीचा परिणाम आता देशाची राजधानी दिल्लीतही दिसू लागला आहे. कोळशाच्या टंचाईच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मेट्रो आणि रुग्णालयांसह अनेक अत्यावश्यक संस्थांना चोवीस तास वीजपुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राला पत्र लिहून राष्ट्रीय राजधानीला वीजपुरवठा करणाऱया वीज प्रकल्पांना पुरेसा कोळसा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
वीजनिर्मिती क्षमता
दुसरीकडे, एकटय़ा उत्तरप्रदेशमध्ये 3 हजार मेगावॅटपेक्षा जास्त विजेचा तुटवडा आहे. 23 हजार मेगावॅट विजेची मागणी असताना पुरवठा 20 हजार मेगावॅट आहे. देशातील एक चतुर्थांश वीजप्रकल्प बंद पडणे हे वीजकपातीचे मुख्य कारण आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यातील निम्मे प्रकल्प बंद आहेत. देशातील सध्याची वीजनिर्मिती क्षमता 3.99 लाख मेगावॅट आहे. यात 1.10 लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा (सौर-पवन) आहे. उर्वरित 2.89 लाख मेगावॅटपैकी 72,074 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प बंद आहेत.