वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर/ दाभाळ
राज्यातील खनिज खाणींच्या पिठात भरपूर पाण्याचा साठा असून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पाण्याचा वापर वीज निर्मीतीसाठी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वीज खात्याचे प्रयत्न चालले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या साहाय्याने येणाऱया सहा महिन्यात ही योजना मार्गी लागेल अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
निरंकाल व तोर्ल भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. पाडल-बेतोडा येथील शिवपंचायतन गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर स्थानिक आमदार व जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर, बेतोडाचे सरपंच उमेश गावडे, शिरोडा जि. पं. सदस्य नारायण कामत, शिरोडाच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, वीज खात्याचे अधीक्षक अभियंते राजू सामंत, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, साहाय्यक अभियंते प्रकाश नाईक, कंत्राटदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिरोडा मतदारसंघातील निरंकाल व तोर्ल भागातील वीज वाहिन्या वन्य परिसरातून जात असल्याने या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या आहे. त्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या घालण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात होती. वीजमंत्री सुदिन ढवळीकर व वीज खात्याने त्याची दखल घेत अंदाजे रु. 3 कोटी खर्चून हे काम हाती घेतले आहे.
राज्यातील सर्व चाळीसही मतदार संघामध्ये वीज प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये भूमीगत वीज वाहिन्या, नवीन ट्रान्स्फॉर्मर, उपकेंद्रांचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सौर उर्जेतून वीज निर्मितीवरही भर दिला जात आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, जनतेला अखंडीत वीज व सुरळीत पाणी व्हावा यासाठी सरकार काम करीत आहे. येणाऱया काळात लोकांच्या या प्राथमिक गरजा प्राधान्यक्रमाने पूर्ण केल्या जातील विकास कामांना लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. नारायण कामत यांचेही यावेळी भाषण झाले. प्रकाश नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना नाडकर्णी यांनी तर श्रृती नाईक यांनी आभार मानले.