वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पुन्हा एकदा निष्कलंक आणि निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विविध पक्षांच्या अनेक पराभूत उमेदवारांनी या यंत्रांसंबंधी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या आक्षेपानुसार या यंत्राची पुन्हा परीक्षा करण्यात आली. या अग्निपरीक्षेत ही यंत्रे पुन्हा उत्तीर्ण झाली असून ती निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वोच्च न्यायालयाने ही यंत्रे निर्दोष असल्याचा निर्वाळा देत केंद्रीय निवडणूक आयोगालाही क्लिनचिट दिली होती. मात्र, पराभूत उमेदवाराला काही शंका असेल तर तो या यंत्रांच्या फेरतपासणीची मागणी करु शकतो, असे आपल्या निर्णयपत्रात न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे परिणाम समोर आल्यानंतर काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि अन्य अनेक प्रादेशिक पक्षांच्या पराभूत उमेदवारांनी या यंत्रांसंबंधात आक्षेप सादर केले होते. या आक्षेपांच्या अनुसार यंत्राची परीक्षा करण्यात आली होती.
न्यायालयाचा निर्णय काय होता
जी निवडणूक इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या साहाय्याने होईल, निवडणुकीतील मतदान यंत्रांचे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मेमरी युनिट राखून ठेवले 90 दिवसांपर्यंत राखून ठेवले जावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. या युनिटच्या साहाय्याने हे यंत्र योग्य प्रकारे काम करत आहे की नाही, याची परीक्षा करता येते. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रथम दोन क्रमांकाच्या पराभूत उमेदवारांना सात दिवसांमध्ये आक्षेप नोंदविण्याची अनुमती दिली होती.
एकही दोषी यंत्र नाही
ज्या पराभूत उमेदवारांनी आक्षेप सादर केले होते, त्यांच्यासमक्ष त्यांच्या मतदारसंघातील यंत्रांच्या मेमरी युनिटची परीक्षा करण्यात आली आहे. आतापर्यंत एकाही यंत्रात कोणताही दोष आढळून आलेला नाही. दोन प्रकरणांमध्ये असा प्रकार घडला की ज्यांनी आक्षेप सादर केला होता ते उमेदवार आयोगाच्या कार्यालयात आलेच नाहीत. अन्य सर्व प्रकरणांमध्ये ही यंत्रे पूर्णत: निर्दोष असल्याचे आढळले आहे, असे आता स्पष्ट झाल्याने आक्षेप फेटाळले आहेत.
एकंदर आठ अर्ज
लोकसभा निवडणुकीच्या मतगणनेनंतर एकंदर आठ लोकसभा मतदारसंघांमधून पराभूत उमेदवारांनी आक्षेप सादर केले होते. हे अर्ज सहा राज्यांमधील 92 मतदानकेंद्रांसंबंधात होते. तर विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात हे आक्षेप दोन राज्यांमधील 26 मतदारकेंद्रांच्या संदर्भात होते. तामिळनाडूतील वेल्लोर, महाराष्ट्रातील अहमदनगर, हरियाणातील कर्नाळ आणि फरीदाबाद, छत्तीसगडमधील कांकेर, तेलंगणातील जहीराबाद, आंध्र प्रदेशातील विजयनगर हा लोकसभा मतदारसंघ, तर गजपतीनगरम् आणि ओंगोले या विधानसभा मतदारसंघातून, तर ओडीशाच्या झारसुगुडा लोकसभा मतदारसंघातून आक्षेप आले होते. लोकसभेच्या आठ मतदारसंघापैकी 4 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी, 1 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने तर अन्य तीन मतदारसंघांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आक्षेप नोंदविले होते. मात्र, कोठेही कोणताही दोष आढळला नाही.
सातत्याने आक्षेप
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष वगळता इतर पक्षांनी सातत्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी आक्षेप व्यक्त केलेले आहेत. या यंत्रांमध्ये हेतुपुरस्सर घोटाळे करण्यात येतात, जेणेकरुन भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, अशी टीका करुन लोकांच्या मनात निवडणूक यंत्रणेसंबंधीच अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी अनेकदा केलेला आहे. अनेकदा ही प्रकरणे न्यायालयांमध्ये गेलेली आहेत. मात्र, कोणत्याही चौकशीत विरोधकांना आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. तरीही केवळ राजकीय डावपेचांचा भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांला लक्ष्य करण्यात आलेले आहे. मात्र, प्रत्येक वेळी विरोधकांचेच हसे झाले आहे. या यंत्रांवरील सर्व आरोप खोटे आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या महत्वाच्या निर्णयानंतर या प्रकरणावर पडदा पडला असला तरी अगदी मोजक्या संख्येने उमेदवारांनी आक्षेप सादर केले होते. त्यांचेही निराकरण आता झाले आहे.