तामिळनाडू-तंजावरमध्ये भीषण दुर्घटना : दोन मुलांचा समावेश
चेन्नाई / वृत्तसंस्था
तामिळनाडूच्या तंजावरमध्ये रथोत्सव मिरवणुकीवेळी बुधवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान रथाचा विद्युततारांना स्पर्श झाल्यानंतर भाविकांना बसलेल्या वीजेच्या धक्क्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील उत्सवी वातावरणावर दुःखाची छाया पसरली.
तंजावरमधील मंदिरातील उत्सवादरम्यान रथयात्रा सुरु असताना वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. येथील एका मंदिरामध्ये 94 वा अप्पर गुरु पूजा उत्सवाचा कार्यक्रम सुरु होता. या उत्सवासाठी मोठय़ा संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. रस्त्यावर पारंपारिक रथ यात्रेच्या वेळी एका वीजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळे वीजेचा धक्का बसल्याने भाविकांना प्राणास मुकावे लागले. या घटनेनंतर अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याला सुरुवात केली.
मंगळवारी रात्रीपासून भाविकांची गर्दी
तंजावरच्या कालीमेडू मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव साजरा केला जात आहे. त्यात सहभागी होण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. रथयात्रा एका वळणावरून जात असताना रथावर उभे असलेले लोक उच्च दाबाच्या विद्युततारेच्या कचाटय़ात आल्यामुळे ही दुर्घटना घडली. याप्रसंगी 9 फूट उंचीचा रथ फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला होता. रथाचे दिवे लावण्यासाठी जनरेटरही जोडण्यात आला होता. जखमींमध्ये जनरेटर ऑपरेटरचाही समावेश आहे.
वीजपुरवठा बंद न केल्याने झाला घात
या दुर्घटनेप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. या रथोत्सवादरम्यान अशा घटना टाळण्यासाठी मंदिराकडे जाणारा वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित होते. रथाची उंची हायव्होल्टेज लाईनला स्पर्श करण्याएवढी नसल्याने यावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आला नाही. मात्र, रथावरील उपकरणांमुळे त्याची उंची वाढल्याने हा अपघात झाला, असे तिरुचिरापल्ली सेंट्रल झोनचे आयजीपी व्ही. बालकृष्णन यांनी सांगितले.
पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचवेळी, पंतप्रधानांनी या अपघातात प्राण गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करत तामिळनाडू विधानसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.