शनिवारखूट येथील सुशोभिकरण केलेल्या कचराकुंडाची स्थिती जैसे थे
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विविध भागातील कचराकुंड्या हटविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण काही केल्या कचराकुंड्या हटत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारखूट परिसरातील कचराकुंडी हटवून सुशोभिकरण करण्यात आले होते. मात्र याठिकाणी पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली असून भटकी जनावरे या ठिकाणी ठाण मांडत आहेत. याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कचराकुंड्या हटविण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचराकुंड्या हद्दपार करण्यासाठी सुशोभिकरण करून झाडांची रोपे लावण्यात येत आहेत. पण काही दिवसानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या… अशी परिस्थिती निर्माण होत आहे. शनिवारखूट येथील कचराकुंडी हटविल्यानंतर काही दिवसातच पुन्हा या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा साचू लागला आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांसह परिसरातील व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचरा टाकू नका, अशी सूचना करूनही व्यावसायिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून कचरा टाकणारे नागरिक व्यावसायिकांबरोबरच वाद घालत आहेत. कचरा टाकण्यात येत असल्याने काही भटकी जनावरे या ठिकाणी ठाण मांडून बसत आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. काही जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे शनिवारखूट येथील कचराकुंडीसह भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.