दिवे असूनही बंद असल्याने अंधारातच करावी लागते ये-जा
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ-उद्यमबाग या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. याचबरोबर फुटपाथ आणि सायकल ट्रकदेखील करण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावरील सर्व पथदीप बंद आहेत. त्यामुळे अंधारातच ये-जा करावी लागत आहे. जुने विद्युत दिवे आहेत. मात्र ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा तातडीने हे दिवे सुरू करावेत, अशी मागणी अनगोळ व उद्यमबाग परिसरातील नागरिकांतून होत आहे.
अनगोळ ते चौथा रेल्वेगेट या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजुला विद्युतखांब उभे करण्यात आले, पथदीपही बसविण्यात आले. मात्र एकही पथदीप सुरू नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. रात्रीच्यावेळी नागरिक, विद्यार्थ्यांना आणि महिलांना ये-जा करणे अशक्मय झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांना अंधारातच वाट काढावी लागत आहे.
अंधार असल्यामुळे कोठे फलक आहे, कोठे वाहने उभी आहेत हे समजत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी महिलांना तर ये-जा करणे अशक्मय आहे. तेंव्हा तातडीने या परिसरातील पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.