स्मार्ट रस्त्यांसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात : दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास करून स्मार्ट रस्ते बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी 1 हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, संपर्क रस्त्यांच्या ठिकाणी खड्डे आणि चरी निर्माण झाल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे स्मार्ट रस्त्यांसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक कोटी निधीची तरतूद करून विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. या अंतर्गत 600 कोटींच्या निधीमधून शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. राणी चन्नम्मा चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचा विकासदेखील करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याला जोडलेल्या संपर्क रस्त्यांवर व्यवस्थित रॅम्प आणि जोडणी केली नसल्याने ठिकठिकाणी चरी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः अयोध्यानगरला जाणाऱया रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला असून या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या परिसरात विविध रुग्णालये आणि शोरूम असल्याने नागरिकांची ये-जा नेहमीच असते.
खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना फटका…
याठिकाणी काँक्रिटीकरण संपलेल्या रस्त्याशेजारी मोठा खड्डा निर्माण होऊन पावसाचे पाणी साचले आहे. खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात घडत आहेत. अशाप्रकारे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी आता हे खड्डे धोकादायक बनले आहेत. या परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.