वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर मेन रस्त्यावर तीन-चार ठिकाणी दोन फूट खोलीचे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे सदर रस्ता प्रवासी वर्गासाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. ग्रा. पं. सदस्यसुद्धा याच रस्त्यावरून ये-जा करत असूनसुद्धा खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तेंव्हा संबंधीत खात्याचे अधिकारी कंत्राटदार व लोकप्रतिनिधीनी त्वरित लक्ष देऊन रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षापूर्वी करण्यात आले आहे. सदर रस्त्यावरून गावासाठी सोडण्यात आलेल्या केएलई मार्गे व शाहूनगरमार्गे बसेसचीसुद्धा नेहमी वर्दळ असते. तसेच कंग्राळी गावची लोकसंख्या 30 हजारच्या घरात असल्यामुळे दुचाकी, चारचाकी, वाहनधारकांची संख्या फार मोठी आहे. रस्त्यावर तीन-चार ठिकाणी पडलेल्या या अधिक खोलीच्या मोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारकांना व बसचालकाला तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ची सदस्य संख्या 34 आहे. हे सर्व 34 सदस्य दररोज याच खड्डे पडलेल्या रस्त्यावरून ये-जा करतात. परंतु कोणीही हे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्याचा विचार करत नाहीत. पुढे एखादा निष्पाप बळी गेल्यावरच हे खड्डे बुजविणार की काय? असेही नाराजींचे प्रश्न प्रवासीवर्गातून उपस्थित होत आहेत.
आठ दिवसांपूर्वी अपघात होऊनसुद्धा खड्डे तसेच
गेल्या आठ दिवसांपूर्वी रस्त्यावरील हे खड्डे चुकवत दुचाकी वाहन चालवताना दोन दुचाकी वाहनधारकांमध्ये अपघात झाला. यामधील महिलेला मोठा मार बसून हाड मोडले आहे. तेव्हा या उपचारासाठी त्यांना मोठा खर्च झाला आहे. रस्त्याची जर दुरुस्ती झाली असती तर हा अपघात घडला नसता. निदान यापुढे तरी रस्ता दुरुस्तीसाठी ग्रा. पं. चे डोळे उघडतील काय, अशीही संतापजनक प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.