शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
भाजीपाल्याचे दर अचानकपणे गडगडत आहेत. केवळ दलालांमुळे हा प्रकार घडत आहे. तेव्हा भाजीपाल्यांचे कायमस्वरुपी किमान दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा. केरळमध्ये अशाप्रकारे कायदा करण्यात आला आहे. त्याचप्रकारे कर्नाटक राज्यातही करावा, अशी मागणी नेगील योगी रयत सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकरी भाजीपाला पिकविण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात. त्यासाठी काबाडकष्ट करतात. मात्र, बऱ्याचवेळा भाजीचे दर गडगडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला परवडणे अवघड झाले आहे. दलाल आणि व्यापारी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी भाजीपाल्याला हमीभाव ठरवावा आणि त्याप्रमाणे कायदादेखील करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील अनेक गावांमधील घरे पावसामुळे कोसळली होती. मात्र, अनेकांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. तेव्हा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुद्रगौडा पाटील, बाबू पुजार, गंगण्णा शिंत्रे, यल्लाप्पा कानप्पण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.