ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मंजूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून समजते.
मागील काही वर्षांपासून राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे वाढीस लागली आहेत. या मुद्यावर अनेक भाजप आमदारांनी आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या हे देखील लव्ह जिहादच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. राज्य सरकार हा कायदा करण्यास सकारात्मक असून, येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मंजूर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
अधिक वाचा : ‘राज ठाकरे चूहा है’ म्हणणारे बृजभूषण सिंह पुण्यात येणार, मनसे विरोध करणार?
उत्तरप्रदेशात हा कायदा आधीपासूनच लागू आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, तसेच अशा प्रकारच्या विवाहाला साह्य करणं हे या कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.