कराडला हिंदू गर्जना मोर्चाद्वारे मागणी
वार्ताहर/ कराड
राज्यासह देशभरात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हिंदू धर्मातील मुलींना लक्ष करून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्यात येत आहेत. तर हिंदू धर्मातील गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधात कडक कायदे करावेत, अशी मागणी आमदार राजेंद्र ठाकुर उर्फ राजाभैय्या यांनी केली.
लव्ह जिहाद, धर्मांतर व गोहत्या विरोधात कडक कायदे करावेत, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी कराडात हिंदू गर्जना मोर्चा काढला. आमदार राजाभैय्या यांच्यासह हिंदू एकताचे विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, विद्या पावसकर, सीमा घार्गे, स्वाती पिसाळ, सोनल भोसेकर, रोहिणी शिंदे यांच्यासह डोक्यावर भगवी टोपी व हातात भगवे ध्वज घेतलेले हजारो युवक व महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पांढरीचा मारूती मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सुरुवातीला मानाचा भगवा ध्वज होता. चावडी चौकमार्गे मुख्य बाजारपेठेतून मोर्चा दत्त चौकात आला. यावेळी लव्ह जिहाद, धर्मांतरण व गोहत्या विरोधात जोरदार घोषणाबजी करण्यात आली. दत्त चौकात मोर्चा आल्यानंतर युवतींसह आमदार राजाभैय्या यांनी मार्चाला मार्गदर्शन केले. तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिल्यानंतर शपथ घेऊन मोर्चाची सांगता झाली.
आमदार राजाभैय्या म्हणाले की, देशात सध्या लव्ह जिहादची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये हिंदू मुलींना लक्ष बनवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. तसेच गोहत्या बंदी कायदा असूनही त्याचा म्हणावी तशी अंमलबजावणी केली जात नाही. देशात जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहेत. या विरोधात राज्यभर गेल्या काही दिवसांपासून हिंदू गर्जना मोर्चा काढला जात आहे.
हिंदू एकवटला तर दुसरी श्रद्धा वालकर होणार नाही. सरकारने आजच्या मोर्चाची दखल घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा त्वरित करावा. महाविद्यालये, शिकवण्यांसमोर मुलींना हेरण्यासाठी विशिष्ट धर्मीय मुले थांबणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कराडमधून अनेकजण धर्मरक्षणाचे काम करत आहेत. धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या माता भगिनींना लव्ह जिहादच्या नावाखाली फसवले जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच घडते असे नाही, तर देशाच्या सर्व राज्यांमध्ये हा प्रकार सुरू आहे. माता-भगिनींना फसवले जात आहे. याची सुरुवात केरळमधून झाली. त्याचे लोन आज संपूर्ण देशभर पसरले आहे. हिंदूंच्या माता भगिनींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना पाकिस्तान, बांग्लादेश किंवा अफगाणिस्तानमध्ये पाठवले जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. लव्ह जिहाद विरोधात सुरू असलेला हा संघर्ष केवळ आपला संघर्ष नसून संपूर्ण हिंदुस्तानचा व हिंदूंचा संघर्ष आहे, असे ते म्हणाले.
आजचा हा संघर्ष येणाऱया पिढीच्या रक्षणाचे काम करेल. लव्ह जिहाद विरोधात कायदा झाल्यास आपल्या माता-भगिनींकडे डोळे वर करून पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आपल्या माता भगिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोण फसवणूक करत आहे, त्यांचा शोध घेऊन त्यांना समजावून सांगितले पाहिजे. समजावून ऐकत नसतील तर त्यांना समजेल अशा भाषेत सांगितले पाहिजे, असेही आमदार राजाभैय्या म्हणाले.
लव्ह जिहाद व धर्मांतरणबाबत फलक
मोर्चात सहभागी झालेल्या युवक व युवतींच्या हातात लव्ह जिहाद व धर्मांतर बाबत जनजागृती करणारे फलक मोठय़ा संख्येने होते. गाय हमारी माता है, ये पुरा भारत गाता है, ये लव्ह नही जिहाद है, सोची समझी साजिश है, हिंदू बेटियों हिंदू बनो, लव्ह जिहाद को पहचानो, हिंदू पालकांनो सावधान अशा प्रकाचे फलक हातात घेतले होते. भगव्या टोप्या, ध्वज व जोरदार घोषणांनी कराड शहर दणाणून गेले.
मोर्चा होईपर्यंत बाजारपेठ बंद
संयोजकांनी रविवारी येथील बाजारपेठेत फिरून व्यापाऱयांना व्यवहार मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शहरातील व्यापारी, गोप्रेमी सहभागी झाले होते. मोर्चा होईपर्यंत मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चा झाल्यानंतर पेठेतील व्यवहार सुरळीत झाले. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.