नगरपंचायतीचे दुर्लक्ष : रहदारीस अडथळा : पादचारी संतप्त
बातमीदार /खानापूर
खानापूर स्टेशन रोडवर नगरपंचायतीने लोकांना ये-जा करण्यासाठी फूटपाथची निर्मिती केली आहे. परंतु फूटपाथलगतच्या दुकानदारांनी आपली दुकाने फूटपाथवरच थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे स्टेशन रोडवर रहदारीत समस्या निर्माण होत आहे. अनेक वेळा अपघात घडण्याची शक्यता असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
येथील शिवस्मारक ते महाजन खुटपर्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकाने आहेत. बेळगाव-पणजी महामार्गापासून शिवस्मारकजवळ खानापूर शहरात प्रवेश केला जातो. गेल्या वीस वर्षांत या रस्त्यावरील वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. बाजारासाठी येणारे वाहनधारक आपली वाहने दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर लावतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम गर्दी पाहावयास मिळते. वारंवार ट्राफिक जाम होते. ही समस्या लक्षात घेऊन खानापूर नगर पंचायतीने शहरातील स्टेशन रोडच्या दोन्ही बाजूला पादचाऱयांसाठी फूटपाथची निर्मिती केली आहे. हा फूटपाथ चुकीचा बांधला गेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने फूटपाथ बांधल्याने रस्ता लहान बनला. त्यातच फूटपाथला लागूनच दुचाकी लावल्यामुळे साधे चालत जाणेसुद्धा कठीण बनले आहे. नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून चुकीचा फूटपाथ काढून नव्याने बनवून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.