बेळगाव प्रतिनिधी – काँग्रेस रोड रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, याकरीता गेल्या 25 वर्षांपासून भट यांनी लढा दिला. मात्र नुकसान भरपाई देता येत नसल्याचा दावा करून महापालिकेने अखेर कला मंदिर जागेतील इमारतीवर मंगळवारी सकाळी पोलीस संरक्षणात जेसीबी फिरवला. यावेळी भट यांना बोलवण्याचा प्रयत्न केला असता, येण्यास नकार दिला यामुळे मनपाच्या कर्मचार्यांनी इमारतीमधील साहित्य हटवून कारवाई केली. मालमत्ता महापालिकेची होती, तर इतका फौज फाटा कशासाठी? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
कला मंदिरच्या जागेत व्यापारी संकुल उभारणीसाठी 2019 मध्ये भाजी मंडई हटविण्यात आली होती. मागील 25 वर्षांपासून महापालिकेला निवेदने देवून विनंत्या केल्या होत्या. तसेच राज्यशासनाला निवेदन देवून नुकसान भरपाईची मागणी करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकवेळा आंदोलन केले होते. मात्र 26 वर्षांच्या प्रतीक्षेनंतरहि महापालिकेने तर नुकसान भरपाई दिली नाहि. मात्र काँग्रेस रोड रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांना कायमस्वरुपी नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणी करीता भट यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विस्तापितांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नगरविकास खात्याला केली होती. त्यानुसार मनपाकडून आवश्यक माहिती घेवून नुकसान भरपाई देता येत नसल्याचे पत्र भट यांना पाठविले होते.
त्यामुळे इमारत पाडण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांनी घिसाडघाई चालवली होती. इमारत पाडण्यासाठी सोमवारी सकाळपासून हालचाली सुरू होत्या. मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रत महापालिकेच्या हाती नसल्याने कारवाई करण्यात आली नाहि. निकालाची प्रत घेण्यासाठी मनपाचे अधिकारी सोमवारी दिवसभर धारवाड उच्च न्यायालयात ठाण मांडून होते. सायंकाळी निकालाची प्रत हाती लागल्यानंतर 7 वाजता भट यांना फोन करून इमारत पाडणार आहे. गाळय़ामधील तुमचे साहित्य हटवा, अशी सूचना मनपाच्या अधिकार्यांनी केली. पण यावेळी आपण येणार नाहि, तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती करा, असे यांनी सांगितले. तर मंगळवारी सकाळी 6 वाजता कला मंदिर येथे दाखल होऊन कारवाईस प्रारंभ केला. यावेळी भट यांना मोबाईलवर संपर्क साधून गाळय़ामधील साहित्य हटविण्यासाठी येण्याची सूचना केली. पण भट यांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्ण पोलीस फाटा घेऊन मनपा साहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांनी भट यांचे घर गाठले. गाळय़ाकडे येण्यासाठी दबाव टाकला. पण आपण कोणत्याहि स्थितीत येणार नाहि, अशी भूमिका भट यांनी घेतली. त्यामुळे मनपाच्या अधिकार्यांनी माघारी परतून सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून सामान हटवत इमारत पाडण्याची कारवाई पूर्ण केली. या कारवाईसाठी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी आरोग्य, नगर योजना विभाग आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे हा गाळा हटविण्यासाठी पोलीस फौजफाट्यासह शंभरांहून अधिक मनपाचे दाखल झाले होते.
Previous Article‘इफ्फीत’ तब्बल 280 चित्रपटांची पर्वणी
Next Article वर्ल्ड स्पर्धेत अर्हनने दाखवली कलेची झलक