गेहलोतांचा आरोप : भाजपकडे ईडी, माझ्याकडे गॅरंटी
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत त्यांच्याकडे ईडी असली तरी माझ्याकडे गॅरंटी असल्याचे म्हटले आहे. माझ्याकडे विकासाची गॅरंटी आहे. केंद्र सरकार आणि भाजप ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. लोकशाहीतील लढाई ही शत्रुत्वाची नसते. परंतु दिल्लीतील सरकार शत्रूसारखी वागणूक देत आहे. आम्ही जणू देशाचे शत्रू आहोत अशाप्रकारचे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत. माझ्या निकटवर्तीयांवर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर ईडीचे छापे पडले आहेत. गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा समवेत भाजप नेते राजस्थानचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमधील त्रुटी भाजपने दाखवून द्याव्यात. माझ्या योजना कशा निष्प्रभ ठरल्या हे भाजपने पुराव्यांसह दाखवून द्यावे असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
परंतु भाजप याऐवजी निरर्थक आरोप करत आहे. आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊन आमच्या गॅरंटी पूर्ण करणार आहोत असा दावा गेहलोत यांनी केला आहे.