मुख्यमंत्र्यांचे राज्यातील खासगी उद्योगांना आवाहन : उद्योजकांच्या समस्या सोडवून सहकार्याचे आश्वासन : खासगी कामगारांना सरकारी योजना लागू करणार
पणजी / प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील उद्योगपतींना खाजगी क्षेत्रात काम करणाऱया गोव्यातील लोकांना नोकरीची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर उद्योगांना कुशल कार्यबळ उपलब्ध करून देण्याचे आणि खाजगी क्षेत्रातील लोकांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योगांच्या समस्या आम्ही शंभर टक्के सोडवू असे, डॉ सावंत यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या बैठकीत काल गुरुवारी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव पुनीत कुमार, वीज सचिव वायव्हीव्हीजे राजशेखर, पर्यटन सचिव रवी धवन, उद्योग सचिव सी. आर. गर्ग, जीआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक वेनान्सियो फुर्तादो, जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसौझा, उपाध्यक्ष श्रीनिवास धेंम्पो आणि इतर प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. गोव्यातील औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
समस्या सोडविण्यात अडचण नाही
आम्ही आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर स्वयंपूर्ण गोव्याचे व्हिजन पुढे चालू ठेवत आहोत. गोव्यात उद्योग वाढले तर राज्याला मोठा फायदा होईल. तक्रार निवारण समिती स्थापन केल्याने भविष्यात सरकार आणि उद्योग यांच्यातील समस्या सोडविण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करण्यात मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तेलंगण औद्योगिक मॉडेलने प्रभावित
मुख्यमंत्री सावंत यांनी औद्योगिक क्षेत्रात अजूनही सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गोव्यात अडथळय़ांशिवाय व्यवसाय करणे सुलभ व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आपण नुकतीच तलंगणाला भेट दिल्याचे सांगून तेलंगणाच्या औद्योगिक मॉडेलने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. तो मॉडेल गोव्यात लागू करण्याचा विचार करीत आहे, असेही ते म्हणाले.
प्रदूषणरहित उद्योगांना प्रोत्साहन
राज्यात प्रदूषण न करणाऱया उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला गोव्याची ताकद ओळखण्याची गरज आहे, आणि ते म्हणजे आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्र. इथून आपण वैद्यकीय पर्यटन इत्यादींचा वाव शोधू शकतो. आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये नवनवीन गोष्टी आणण्याची गरज आहे आणि पर्यटनाचा भरभराट व्हायचा असेल तर टॅक्सीसारख्या दीर्घकालीन समस्या सोडवायला हव्यात, असे ते म्हणाले. डॉ. सावंत यांनी ब्लू इकॉनॉमी आणि शिक्षण क्षेत्रावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
रोजगार निर्मितीच्या गरजेवर भर देताना डॉ. सावंत यांनी जीसीसीआयने नवीन उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी सरकार मदत करण्यास तयार आहे असे सांगितले. भाजीपाला, दुग्ध व्यवसाय इत्यादींच्या खरेदीतून बराच महसूल राज्याबाहेर जातो जो आपण आपल्या गोव्यातील शेतकरी आणि उद्योजकांना पुरेशा प्रमाणात प्रेरित केल्यास देऊ शकतो असे ते म्हणाले.