वृत्तसंस्था /रांची
भारतामध्ये पहिल्यांदाच होणाऱया फिडेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या क्रीडाज्योत प्रवासाला (रिले) यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. गुरुवारी रांचीमध्ये या क्रीडाज्योतीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
झारखंडचे क्रीडामंत्री हफिझुल हसन यांनी येथील खेलगाव क्रीडा संकुलात या ज्योतीचे स्वागत केले. ग्रॅण्डमास्टर सप्तषी रॉय चौधरीने अन्य क्रीडा क्षेत्रातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रांचीतून पुढे नेली. बुधवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीचा प्रवास गया, राजगिर तसेच बिहारमधील पाटणा असा झाला. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योतीने आतापर्यंत आपल्या प्रवासात लेह, जम्मू, श्रीनगर, धरमशाला, सिमला, चंदीगढ, पतियाळा, अमृतसर, पानिपत, गुरुग्राम, कुरुक्षेत्र, डेहराडून, हरिद्वार, मिरत, कानपूर, केवाडिया, अहमदाबाद, दांडी, सूरत, जयपूर, दमण, मुंबई, पुणे, नागपूर, पणजी, भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि झांशी या शहरांना भेट दिली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रिलेचे उद्घाटन यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर ज्योतीचा प्रवास 40 दिवसांचा असून या कालावधीत ही ज्योत 75 शहरांना भेट देणार आहे.
या क्रीडाज्योत प्रवासाची सांगता तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे स्पर्धा ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेमध्ये किमान 200 देशांचे बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर पहिल्यांदाच फिडेने बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत रिले आयोजित केली आहे. 44 वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.