प्रतिनिधी /सांगे
साळावली धरणावर शनिवार दिनांक 6 ऑगस्ट पासून पर्यटकासाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याचे भूषण आणि निसर्ग सौन्दर्याचा सुंदर आविष्कार घडवीणारे सांगे येथिल साळावली धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत असल्याचा आनंद आता पर्यटकांना लुटला येणार आहे. रविवारी सुमारे नव्वद पर्यटकांनी भेटी दिल्याचे वृत्त आहे.
गत वर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस धरणाचा जलाशय लवकर भरला होता. मात्र पर्यटकांना धरण भरल्याचा आनंद लुटला आला नाही. गेले दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे धरणावर पर्यटकासाठी प्रवेश बंदी होती. वास्तविक धरण ओव्हरफ्लो होण्याच्या क्षणाची केवळ सांगेवासिय नव्हे तर तमाम गोव्यातील पर्यटक आतुरतेने वाट पाहतात.
यावषी 8 जुलै रोजी सकाळी 10.54 वाजता धरण ओव्हरफ्लोचा योग घडून आला होता. मनाला भुरळ पाडणारे हे दृश्य पाहण्यासाठी शाळावली धरणाकडे पर्यटकाची रिघ लागायची. परंतु कोरोनामुळे गेले दोन वर्षे प्रवेश बंदी असल्यामुळे पर्यटकांना ओव्हरफ्लोचा आनंद लुटता आला नाही.
आता प्रवेश बंदी उठविल्याने पर्यटकाची पावले धरणाकडे वळू लागली आहेत. सुट्टी तसेच वीकएन्ड म्हणजे शनिवार आणि रविवारच्या दिवशी पर्यंटकांची प्रचंड गर्दी असते. धरणावर पर्यटकांना प्रवेश खुला केल्याने बॉटनिक गार्डनचा महसूल देखील वाढणार आहे.
साळवली धरण ओव्हरफ्लो होऊ लागले की येथे वर्षा पर्यटनाला खूप महत्व प्राप्त होते. येथिल वातावरण माणसाला प्रसन्न करून सोडते. त्यामुळे देशी विदेशी पर्यटक धरणाला भेट देऊन निसर्ग सोन्दर्यचा आनंद लुटतात.
पावसाळय़ात इथला आनंद तसा निराळाच असतो. पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच. जुलै महिना सुरु झाला की धरण तुडुंब भरून व्हाऊ लागते. उंचावरून पडणारे पाणी अंगावर शहारे आणतात. धरणाच्या मुखातून बाहेर पडणाऱया पाण्याची क्षमता 60 घनमिटर प्रति सेकंड इतकी आहे.
शाळावली धरण पाण्याच्या बाबतीत दक्षिण गोव्याला जसे वरदान तसे पर्यटनदृष्टय़ा गोव्याची शान वाढवीत आहे. त्यातच धरणाच्या पायथ्याशी असलेले “बोटनीकल गार्डन ” इथल्या सौन्दर्यात अधिक भर घालते. धरणाची पातळी 41.15 मिटरनी भरली की, ओव्हरफ्लो होऊ लागतो.
धरणाच्या दोन्ही बाजूनी आपली वाहने पार्क करून पायी चालत जाऊन धरण पहावे लागते. येथे फोटोग्राफीला मान्यता नसून जलसोत्र खात्याने धरणावर सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.