प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे व प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱया गणेशमुर्ती देखील पर्यावरणपूरक असाव्यात या हेतूने कोल्हापूर जिल्हा परिषदेत नैसर्गिक सामग्री व शाडूची माती वापरून तयार केलेल्या मुर्ती प्रायोगिक प्रकल्पांतर्गत ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कुंभार बांधवांनी या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशमुर्ती बनवाव्यात आणि नागरीकांनीही अशा मुर्तींची खरेदी करून प्रतिष्ठापना करावी असे आवाहन प्रशासक चव्हाण यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे.
कंथेवाडी, ता. राधानगरी येथील उदय पाटील व मारूती पाटील यांनी आयुर्वेदिक औषधे, वनस्पती व शाडूची माती, मुलतानी माती, हळद, गेरू आदी घटकांचा वापर करून गणेश मुर्ती तयार केल्या आहेत. या मुर्ती कुंडामध्ये विसर्जन केल्यानंतर राहिलेली माती शेतीसाठी किंवा बागांसाठी खत म्हणून वापरता येते. तसेच वाहत्या पाण्यात मुर्ती विसर्जित केल्यानंतर मुर्तीमधील नैसर्गिक द्रव्यांमुळे नदीमधील पाणी शुध्द होण्यास मदत होईल. जलचर प्राण्यांना मुर्तीमधील खाद्य घटक मिळतील व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नसल्याने या मुर्तीपासून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. यामुळे जल प्रदूषणास आळा बसणार आहे, अशी माहिती मूर्तीकार उदय पाटील यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील, माजी जि.प.सदस्य पांडूरंग भांदिगरे, अमर पाटील तसेच जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.