लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील उतारावर किमी 37 जवळ ईर्टिंगा कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. तर एक महिला या अपघातातून सुखरुप बचावली. रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
अब्दुल रहमान खान (32 रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (30, रा. कामोठे. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (23 म्हातारपाडा, मुंबई), अमीरउल्ला चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मच्छिंद्र आंबोरे (38, चालक) व दिपक खैराल हे जखमी झाले असून, अस्फीया रईस चौधरी (25, कुर्ला, मुंबई) या अपघातातून सुखरुप बचावल्या आहेत.
अधिक वाचा : पुण्यात राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे तीव्र आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन ईर्टिगा कार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. या कारमधून चालकासह आठजण प्रवास करत होते. रात्री बाराच्या सुमारास ही कार एक्स्प्रेस वेवरील ढेकू गावच्या हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरच्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जणांना गंभीर इजा झाल्याने एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले. त्यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातून एक महिला बचावली आहे. तिला किरकोळ जखम झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स यांनी मतदकार्य राबविले. खालापूर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.