प्रतिनिधी / वास्को
सांकवाळच्या पठारावर भारतीय आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण व संशोधन विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सांकवाळ पंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेल्या कला भवनमध्ये या विद्यापिठाची सोय करण्यात आलेली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्या हस्ते या विद्यापिठाचे उद्घाटन गुरूवारी संध्याकाळी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई उपस्थित होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत सन्माननिय अतिथी तर न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश खास अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समारंभाच्या व्यासपिठावर गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल, खासदार विनय तेंडुलकर, आमदार दाजी साळकर, आमदार अँथनी वास, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे न्यायमूर्ती महेश सोनक यांच्यासह देशातील विविध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच गोव्याचे ऍडवोकेट जनरल देविदास पांगम, बार काऊन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले व इतर मान्यवर उपस्थित होते.
देशाला विश्वगुरू बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नासाठी गोवाही योगदान देत आहे- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समारंभात बोलताना गोव्यात एका प्रतिष्ठीत विद्यापिठाची स्थापना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून या विद्यापिठाच्या गोव्यातील स्थापनेमुळे गोवा हे देशातील शिक्षणाचे माहेरघर बनवण्याच्या आपल्या सरकारच्या उध्देशाला बळकटी देत असल्याचे सांगितले. भारत देशाला विश्वगुरू बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे स्वप्न पूर्ण करण्याकडे गोवाही योगदान देत असल्याचे या विद्यापिठाच्या गोव्यातील स्थापनमुळे सिध्द होत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यातील कायदा शिक्षणाचे विद्यापिठ हे अशाप्रकारचे एकमेव विद्यापिठ असून आपल्या कार्यकाळात गोव्यात या विद्यापिठाची स्थापना होत आहे याचे मला अतीव समाधान आहे. गोव्यात कायदा क्षेत्रातील विद्यार्थी चांगले कर्तुत्व बजावत असून कायदा विद्यापिठामुळे त्यांना आता अधिक बळ आणि संधी मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अध्यापकही त्यांना लाभणार आहेत. गोव्याने शिक्षण क्षेत्रात हल्ली चांगले क्षण अनुभवलेले आहेत. गोवा खासगी विद्यापिठ कायदा शिक्षण विकासासाठी लाभदायक ठरत आहे. गोवा खासगी शिक्षण संस्थांना आकर्षीत करत आहे. कुंकळळीमध्ये एनआयटीसाठी स्वातंत्र प्रकल्प उभा राहात आहे. धारबांदोडा येथील फॉरेन्सीक लॅब व आता कायदा विद्यापिठाची झालेली स्थापना गोव्यासाठी फार महत्वाचे ठरणार आहेत. बार काऊन्सील ऑफ इंडियाने गोव्यात कायदा शिक्षणाच्या प्रगतीसाठी अधिक लक्ष्य केंद्रीत करावे व शिक्षणाचा खरा हेतू साध्य करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सांकवाळच्या पठारावरील कला भवनमध्ये स्थापन करण्यात आलेले हे कायदा विद्यापिठ तात्पुरत्या काळासाठी या ठिकाणी असणार असून या विद्यापिठासाठी धारबांदोडा येथे स्वातंत्र कॅप्मस उभारण्यासाठी जमीन देण्यात आलेली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात स्पष्ट केले.
या समारंभात न्यायमूती बी.आर. गवई, न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश, न्यायमूर्ती महेश सोनक, बार काऊन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, ऍडवोकेट जनरल देविदास पांगम व इतर मान्यवरांचेही भाषण झाले.