सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा : राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव संमत
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमध्ये जातीय जनगणना करण्याच्या मुद्दय़ावर नितीश कुमार सरकारने बुधवारी निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी जात आधारित जनगणना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्य मंत्रिमंडळात हा प्रस्ताव संमत करत बिहारमध्ये जात आधारित जनगणना करण्यात येणार आहे.
जातीय जनगणनेसाठी निधीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. सर्वसहमतीच्या निर्णयानुसार राज्यात जात आधारित जनगणना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जात आधारित जनगणनेचे काम करणाऱया कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तत्पुर्वी जात आधारित जनगणनेसाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडला जाईल. हा प्रस्ताव संमत झाल्यावर निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जात आधारित जनगणना पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल पूर्णपणे प्रकाशित करण्यात येणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
9 पक्षांचा सहभाग
बुधवारच्या बैठकीत विधानसभेतील 9 पक्ष सामील झाले असून यात भाजपचाही समावेश होता. जातीय जनगणनेसाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कालमर्यादा ठरविण्यात येणार आहे. सर्वधर्म, जातींची गणना होणार आहे. सर्वांची संख्या, स्थिती जाणून घेतली जाणार असून याचे नाव ‘जात आधारित गणना’ राहणार असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. या जनगणनेत पोटजाती तसेच सर्व सांप्रदायांचीही गणना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अल्पसंख्याकांची व्हावी गणना
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायर ब्रँड नेते गिरिराज सिंह यांनी अल्पसंख्याक विशेषकरून मुस्लिमांच्या गणनेची मागणी केली आहे. मुस्लिमांच्या गणनेमुळे रोहिंग्या आणि अन्य घुसखोरांची ओळख पटू शकणार आहे. अशा घुसखोरांना सीमांचल आणि बिहारमधून हाकलण्यास मदत होणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.