महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा : अंजणारी पुलाखाली गॅसवाहू कंटेनर कोसळल्याचा परिणाम : वाहतूक देवधे-काजरघाटीमार्गे वळवली
प्रतिनिधी/लांजा
मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील काजळी नदीत गॅस वाहतूक करणारा कंटेनर कोसळल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 30 तासांपासून अधिक काळ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यायी मार्ग म्हणून देवधे-काजरघाटीमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. तर कंटेनरमधील वायू गळती रोखण्यासाठी भारत गॅसच्या उरण आणि गोवा येथील तज्ज्ञांची टीम तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम आंजणारी येथे दाखल झाली आहे.
शुकवारी सायंकाळी 6 नंतर अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये पास करण्यास सुरुवात झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे गॅस वाहतूक करणारा कंटेनर काजळी नदीत कठडा तोडून खाली कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 2.48च्या दरम्यान घडली होती. या घटनेनंतर टँकरमधून एलपीजी गॅसची गळती लागल्याने गुरुवारी सायंकाळपासूनच महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी देखील सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गेल्या 30 तासापासून मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे महामार्गावर गवाणे फाटा ते देवधेपर्यंत मोठ्या अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेतील टॅंकरमध्ये 18 टन एलपीजी वायू होता. टँकरमधून वायूगळती होत असल्याने यातील 6 टन गॅस वाहून गेल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : काजळी नदीत गॅसवाहू कंटेनर कोसळला, चालक ठार
या टँकरमधील गळती रोखण्यासाठी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अग्निशमन दलाचे आनंद राऊत, संदीप कुळ्ये, राजेंद्र महाडिक, कैलास बुधवंत यांनी नदीत उतरून गॅस गळती बंद केली होती.
शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता तिसरी क्रेन दाखल झाली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टॅंकर गॅस पास करण्यायोग्य करण्यात आला. 6 नंतर अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये पास करण्यास सुरुवात झाली होती.