किनारपट्टीवरील वादळी वातावरणाने मासेमारी व्यवसाय ठप्प
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर गेल्या 5 दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वादळी वाऱयांचाही वेग वाढला आहे. त्याचा परिणाम सर्व मच्ग्नछीमार नौका बंदरातच नांगर टाकून उभ्या असल्याचे चित्र आहे. आठवडा उलटला तरीही 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीसाठी वादळी वातावरणामुळे मच्छीमार समुद्रात जाण्यास धजावलेला नसल्याचे चित्र आहे.
मुसळधार पावसाबरोबरच सोसाटय़ाचे वारे वाहत आहेत. या वादळी पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर उधाणाच्या जोरदार लाटांचा मारा सुरू आहे. किनारपट्टीवर राहणाऱया नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर वादळी वातावरणामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी न जाण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या 1 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारीला प्रारंभ झाला आहे. पण या मासेमारीचा शुभारंभ झालेला असला तरीही हंगामाच्या सुरूवातीलाच या निसर्गाच्या विघ्नामुळे मच्छीमारीवर पाणी फेरले आहे. शुभारंभानिमित्ताने काही नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. पण वादळी वातावरणामुळे त्या नौका पुन्हा किनाऱयाकडे परतल्या. आता तर आठवडा उलटून गेला आहे. तरीही समुद्रातील वादळी स्थिती शांत झालेली नाही. त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱयावर बंदरातच उभ्या करून ठेवल्या आहेत. उधाणाचा धोका लक्षात घेता कुणीही मच्छीमार मासेमारीसाठी धजावलेला नसल्याची स्थिती बंदरातून दिसत असून मासेमारी पूर्णतः ठप्प आहे. मासेमारी बंद असल्याने मासे खवय्यांमध्ये निराशा पसरली आहे.
पंधरामाड किनाऱयावरील ‘बसरास्टार’ कलंडण्याचा धोका
समुद्रातील उधाणाच्या लाटा किनारपट्टीवर येउन आदळत असल्याने येथील मिऱया, पंधरामाड किनाऱयावर जोरदार तडाखा बसत आहे. त्या अजस्त्र लाटांमुळे येथील धूपप्रतिबंधक बंधाऱयासाठी टाकलेले दगड काही प्रमाणात वाहून जात आहेत. येथील किनाऱयावर धूपप्रतिबंधक बंधाऱयाला अडकून बसलेले ‘बसरास्टार’ जहाज अजस्त्र लाटांच्या माऱयामुळे आणखीनच बंधाऱयावर चढले आहे. लाटांचा मारा असाच कायम राहिल्यास हे जहाज एका बाजूला कलंडण्याची भीती येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.