बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे यंदाही भात पिकाला मुकावे लागणार
वार्ताहर / धामणे
भातपीक रोप लागवडीनंतर गेल्या आठवडय़ापासून झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील जुने बेळगाव, वडगाव, शहापूर येथील शेतकऱयांच्या शेतातील भातपीक पाण्याखाली गेल्याने येथील सर्व शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या शेतकऱयांना यंदाही भात पिकाला मुकावे लागणार का? अशी भीती लागून राहिली आहे.
जून महिन्याच्या मध्यंतरी भात पेरणी केली होती. त्यानंतर रोप लागवडीला सुरुवात झाली व जुलै महिन्यात मुसळधार पावसाने उगवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. यानंतर पावसाने उघडीप दिल्याने बाहेरील गावाहून रोप विकत आणून पुन्हा रोप लावण्यात आले. रोप लावलेली शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याशेजारील शेतकऱयांना दुबार खर्च करूनही पीक हाती लागत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बळ्ळारी नाल्यातील गाळ आहे.
या नाल्याच्या खोदाईसाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी सर्व्हे करून शासनाचे अधिकारी बळ्ळारी नाल्याची पाहणी केल्यानंतर फिरकत नसल्याचे या भागातील शेतकऱयांकडून सांगण्यात आले.
या बळ्ळारी नाल्याची सुरुवात येळ्ळूर रस्त्यावर असलेल्या ब्रिजपासून होते. वडगाव, जुने बेळगाव, अलारवाड, कुडची, निलजी, सांबरा शिवारातून सुळेभावीच्या पुढे जातो. या नाल्यात गाळ व जलपर्णी वाढल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळी वरील सर्व गावच्या बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱयांना मोठा फटका बसून नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे शासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे या परिसरात शेती असलेल्या शेतकऱयांकडून सांगण्यात आले. बळ्ळारी नाल्याच्या खोदाईच्या कामाला फेब्रुवारी महिन्यापासून काम सुरू केले तरच पावसाळय़ाआधी काम संपेल. या पुढे तरी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी जातीने लक्ष देऊन शेतकऱयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही समस्या दूर करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱयांकडून होत आहे.
गुरुवारी पावसाची बऱयापैकी उघडीप
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र गुरुवारी सकाळी दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारी मात्र, पावसाने बऱयापैकी उघडीप दिली. अधुनमधून शिडकाव होत होता. यामुळे दुचाकीस्वार व बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते यांना त्रास सहन करावा लागत होता.
चार दिवसांपूर्वी दमदार पावसामुळे साऱयांची दाणादाण उडाली होती. शहरासह ग्रामीण भागातील नाले तसेच मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत होती. नदी पात्रातील पाणी बाहेर पडले होते. बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पूर आला होता. मात्र, आता हा पूर ओसरत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुरुवारी ऊन-पाऊस यांचा लपंडाव सुरू होता. सध्या पावसाने बळीराजाला दिलासा दिला आहे. शेतकऱयांनी भातलावणी पूर्ण करून इतर कामांना सुरुवात केली आहे.