महापालिकेच्या अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर : बांधकाम नियमावलीचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध रस्त्यांवर तसेच इमारत बांधकाम करताना अतिक्रमण केले जाते. मात्र याबाबत तक्रार नसल्याचे सांगून महापालिकेचे अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. तसेच रस्त्यावर पसरलेल्या इमारत बांधकाम साहित्याकडे कानाडोळा केला जातो. याबाबत तक्रार करूनदेखील कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱयांचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर आला आहे.
बांधकाम नियमावलीचे पालन व्यवस्थित होत नसल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. अनधिकृत किंवा बांधकाम नियमावलीचे उल्लंघन केल्याबाबत महापालिकेकडे तक्रारी केल्या जातात. तक्रारीनंतर केवळ नोटीस बजावून आपली जबाबदारी संपली अशा भावनेत मनपाचे अधिकारी काम करीत आहेत. वास्तविक, शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याची जबाबदारी नगर योजना विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची आहे. मात्र केवळ कार्यालयीन कामात व्यस्त असणाऱया अधिकाऱयांनी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला आहे. कोणत्याही रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास तक्रार नसल्याचे सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. पण काही ठिकाणी रस्त्यावर तसेच भंगीबोळात अतिक्रमण झाल्याचे अनेकवेळा महापालिकेच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणूनदेखील कारवाई करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. हिंदवाडीसह सदाशिवनगर परिसरातील अतिक्रमणाबाबत नागरिकांनी महापालिका आयुक्तांच्या नावे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र केवळ पाहणी शिवाय मनपाच्या अधिकाऱयांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. केवळ पाहणी करून आणि नोटिसा बजावून आपली जबाबदारी संपली, अशा अविर्भावात मनपाचे अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमण फोफावत चालले आहे. याला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकाम साहित्यामुळे अडथळा
शहरात विविध ठिकाणी बांधकाम करण्यात येत आहे. विशेषतः बाजारपेठेत व्यापारी संकुलाची उभारणी केली जाते. याकरिता रस्त्याशेजारीच बांधकाम साहित्य ठेवण्यात येते. याचा वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषतः वाळू आणि खडीमुळे दुचाकी वाहने घसरून पडत असतात. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने बांधकाम साहित्य ठेवण्याची अट बांधकाम परवानगी देताना घातली जाते. पण बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बांधकाम परवानगी दिल्यानंतर अनधिकृत बांधकामावर तसेच बांधकाम साहित्यामुळे अडथळा निर्माण होतो का? याची पाहणी करण्याची जबाबदारी नगरयोजना विभागातील अभियंत्यांची आहे. मात्र हे अभियंते याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी टाकलेल्या बांधकाम साहित्याचा त्रास वाहनधारकांना होत असल्याचे अढळले आहे. एकंदर महापालिका अधिकाऱयांनी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.