शासकीय पैशांचा झाला अपव्यय
प्रतिनिधी/चंदगड
चंदगड तालुक्याच्या हद्दीत घटप्रभा नदीवर कोट्य़वधी रुपये खर्चून बांधलेली तीनही पूल उपयोगी ठरताना दिसत नसून गवसे, इब्राहिमपूर, बुजवडे, कुरणी भागातील लोकांना पूर्वीसारखेच एखादय़ा अज्ञात बेटावरील जीवन जगण्याची नामुष्की आली आहे. पावसाळय़ातील वाहतुक सुरळीत व्हावी, यासाठी बांधण्यात आलेले तीनही पुल कूचकामी ठरले आहेत.
घटप्रभा नदीवर गेल्या पंधरा-वीस वर्षात तीन पूल बांधण्यात आले. पहिला पूल हिंडगाव-इब्राहिमपूर दरम्यान बांधण्यात आला. परंतु गवसे कोल्हापूर टाईप बंधाऱयापेक्षाही या पुलाची उंची कमी असल्यामुळे बंधारा बुडण्यापूर्वी हा पूलच पाण्याखाली जातो. त्यावेळी आणखी आठ-दहा फूट पुलाची उंची वाढवली असती तर हा पुल बारमाही वाहतुकीस योग्य ठरला असता. पण दुर्देवाने असे घडले नाही. त्यानंतर कुरणी गावानजिक घटप्रभा नदीवर दुसरा पूल बांधण्यात आला. तो पुल खूप उंच बांधण्यात आला. परंतु पुलाच्या दुतर्फा असलेल्या रस्त्याची उंची वाढवली गेली नाही. त्यामुळे पुल पाण्यात बुडत नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा सुमारे शंभर मीटरपेक्षा अधिक अंतरातील रस्ता महापुराच्या पाण्यात बुडतो. तिसरा पुल अलिकडेच गवसे कोल्हापूर टाईप बंधाऱयाच्या शेजारी बांधण्यात आला आहे. बंधाऱयापेक्षा या पुलाची उंची अधिक आहे. परंतु गवसेच्या दिशेने पुलाशेजारच्या रस्त्याची उंची न वाढविल्यामुळे तोही रस्ता पुराखाली जातो. थोडक्यात घटप्रभा नदीवर बांधलेल्या तीनही पुलावर करोडो रूपये खर्च झाले. परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ झालेला नाही वा मुख्य उद्देश साध्य झालेला नाही.
गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर पडलेले आहे. गवसे, इब्राहिमपूर, बुजवडे आणि कुरणी गावाला जोडणारे पुल पाण्याखाली गेल्याने या गावचा जनसंपर्क तुटला आहे. वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. या गावांचे दळणवळण ठप्प झालेले आहे. नोकरदार मंडळी, विद्यार्थी यांची गैरसोय झालेली आहे. गावचे दूध विक्रीसाठी बाहेर गेलेले नाही, त्यामुळे शेतकऱयांनाही मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. सध्या संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे आणखी किती दिवसांनी पूर ओसरेल, याची निश्चिती नाही. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील पावसाळय़ात होणारी गैरसोय टाळण्यासाठी किमान पुढच्यावर्षीच्या पावसाळय़ापूर्वी तरी गवसे आणि कुरणी पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची उंची पुलाच्या उंचीच्या प्रमाणात वाढवून वाहतुकीतील व्यत्यय दूर करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
घटप्रभा नदीवर कोटय़ावधी रूपये खर्चून तीन-तीन पुल बांधूनही ग्रामस्थांवर अंदमान बेटावर वास्तव्य करीत असल्याप्रमाणे पावसाळय़ात दिवस काढावे लागत आहेत. -रमेश देसाई, गवसे
केवळ पूल बांधून प्रश्न सुटत नाहीत, तर दोन्ही बाजूने व्यवस्थित रस्ते केले तरच पुलाचे बांधकाम सार्थकी लागते, याचा विचार प्रशासनाने करावा. -विलास नार्वेकर, इब्राहिमपूर