एन्ट्री मिळवण्यासाठी चाकरमान्यांची होतेय दमछाक
प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी रविवारी सायंकाळपासूनच परतीची वाट धरली आहे. कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह ‘गणपती स्पेशल’ विक्रमी गर्दीनेच धावत आहेत. स्थानकात दाखल होणाऱया गणपती स्पेशल गाडय़ांमध्ये एन्ट्री मिळवताना चाकरमान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच गणपती स्पेशल गाडय़ा विलंबाने धावत असल्याने गणेशभक्तांचा खोळंबा होऊन विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. जागा न मिळालेल्या संतप्त प्रवाशांना आवरताना पोलीस यंत्रणेसह रेल्वेच्या विशेष कृती दलाच्या नाकीनऊ येत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षानंतर गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी आले होते. गणेशोत्सवात गावाकडे येणाऱया चाकरमान्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने 300 हून अधिक गणपती स्पेशलच्या फेऱया सोडून गणेशभक्तांवर कृपावृष्टीच केली. नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ा तुफानी गर्दीनेच धावल्या. गणपती स्पेशल गाडय़ांची संख्या वाढल्याने एकेरी मार्गामुळे कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत होवून चाकरमान्यांना गाव गाठताना यातायातीलाच सामोरे जावे लागले होते.
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. रविवारी सायंकाळपासूनच चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले. सायंकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमध्ये जागाच न मिळाल्याने चाकरमान्यांचा हिरमोडच झाला. सोमवारी गणरायाला निरोप दिल्यानंतर सायंकाळच्या सुमारास रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची तोबा गर्दी उसळली. गर्दीची तीव्रता लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता ज्यादा पोलिसांची कुमकही रेल्वेस्थानकात तैनात करण्यात आली आहे.
रेल्वेस्थानकात दाखल होणाऱया गणपती स्पेशल गाडय़ांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा अनावर होवून अन्य गाडय़ांची प्रतिक्षा करत स्थानकातच तिष्ठत बसावे लागत आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱया नियमित रेल्वेगाडय़ांसह सर्वच गणपती स्पेशल गाडय़ा हाऊसफुल्ल धावत असल्याने प्रसंगी चाकरमान्यांना आल्या पावली माघारीही परतावे लागत आहे. परतीच्या प्रवासातही रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून 3 ते 4 तास विलंबाने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रोहा–चिपळूण मेमू स्पेशल 9 सप्टेंबरपर्यंत धावणार
गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर पहिल्यांदाच 19 ऑगस्टपासून चालवण्यात आलेल्या रोहा-चिपळूण मेमू स्पेशलला चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. रेल्वेगाडय़ांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मेमूच्या स्पेशलच्या फेऱया वाढवण्यात आल्या आहेत. ही स्पेशल 9 सप्टेंबरपर्यंत धावणार असल्याने परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.