‘तरुण भारत’च्या वृत्ताने प्रशासनाला जाग : पालक-विद्यार्थ्यांतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथे सकाळ व संध्याकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांमुळे शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून सेंट जोसेफ शाळेनजीक रहदारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक व वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सेंट जोसेफ शाळेनजीक सकाळी व संध्याकाळी शाळेच्या वेळेत वाहतूक कोंडी होत होती. त्यातच ग्लोब थिएटरमार्गे हिंडलगाकडे जाणारी अवजड वाहनेही ये-जा करीत असल्याने या कोंडीमध्ये भर पडत होती. कॅम्प येथील रस्ते अरुंद असल्याने अवजड वाहने आल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. बरेच विद्यार्थी हे रिक्षा, सायकलवरून शाळेत येत असल्याने अवजड वाहनांमुळे धोका वाढला होता. यामुळे या परिसरात रहदारी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी पालकवर्गांतून होत होती.
पोलिसांच्या नियुक्तीमुळे दिलासा…
वाहतूक कोंडीचे वृत्त प्रसिद्धी होताच सुनील जाधव यांच्यासह काही पालकांनी या वृत्ताची दखल घेऊन पोलीस उपायुक्त पी. व्ही स्नेहा यांच्यासमोर ही समस्या मांडली. विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणताही खेळ नको, यासाठी त्यांनी ताबडतोब सकाळी व संध्याकाळच्या सुमारास रहदारी पोलिसांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी शाळेच्या वेळेत पोलिसांची नेमणूक करण्यात आली. अवजड वाहनांना काही वेळ थांबवून विद्यार्थी शाळेच्या आवारात गेल्यानंतर वाहने सोडली गेली. त्यामुळे पालकांनी पोलीस प्रशासन तसेच तरुण भारतचे आभार मानले.