तिरुवनंतपुरम ः हिरवाईने नटलेले अन् समुद्राच्या लाटांसारखे जिवंत शहर
केरळची राजधानी असणारे तिरुवनंतपुरम हे शहर अनेकार्थाने विशेष आहे. या शहराला धार्मिक, कला, सांस्कृतिक इतिहास असून त्याची जोपासना करण्याचे काम तेथे होत आहे. भव्य ऐतिहासिक मंदिरांची पार्श्वभूमी असणारे हे शहर अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे. या शहराला नैसर्गिक स्वरुपात लाभलेले सौंदर्य अत्यंत मोहक आहे.
स्वच्छ-सुंदर रस्ते, अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुलांनी बहरलेली कन्नीकोनाची झाडे पाहून महात्मा गांधी यांनी तिरुअनंतपुरम या शहराला ‘एव्हरग्रीन सिटी ऑफ इंडिया’ का म्हटले होते हे लक्षात येते. तिरुवनंतपुरम जिल्हय़ाला 78 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून यात कोवलम, पुवार, वर्कला, वेली लेक, विंझिंम, शंखमुगम यासारखे अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. रात्री उशिरा शंखमुगमच्या किनाऱयावर बसून मच्छिमारांच्या परतणाऱया नौकांना स्वतःच्या दिशेने हळूहळू येताना पाहणे खरोखरच रोमांचक दृश्य आहे.
त्रिवेंद्रम विमानतळाची स्थापना 1932 मध्ये रॉयल फ्लाइंग क्लबने त्रावणकोरच्या राजघराण्याच्या भूमीवर केली होती. 1991 मध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतरित झाले होते. वर्षात दोन दिवस पद्मनाभस्वामी मंदिरातून यात्रा अराट, शंखमुगमच्या किनाऱयावर जाईल, तेव्हा विमानांचे संचालन बंद ठेवण्यात येईल, या त्रावणकोर राज्यघराण्याच्या अटीला मान्यता दिल्यावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा झाला होता. यात्रा अराट धावपट्टीवरून जाते आणि हा प्रकार दोन सणांमध्ये घडतो. पहिल्या सणाचे नाव पनकुन्नी असून हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. दुसरा सण अल्लपसी असून तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा होतो. पनकुन्नीमध्ये पांडवांचे विशाल रंगबिरंगी पुतळे तयार केले जातात आणि या पुतळय़ांना मंदिराच्या पूर्व दिशेकडील द्वारावर सजविण्यात येते. यामुळे इंद्रदेवता प्रसन्न होते, अशी स्थानिक लोकांची मान्यता आहे.
अनोख्या वास्तूंनी नटलेल्या या शहरात एकीकडे भारतीय-सीरियन वास्तुशैलीत तयार करण्यात आलेले नेपियर संग्रहालय आहे. तर दुसरीकडे दविड आणि केरळ वास्तुशैलीच्या सुंदर समन्वयाने निर्माण झालेले पद्मनाभस्वामी मंदिर आहे. गोथिक शैलीत तयार करण्यात आलेल्या ‘सीएसआय क्राइस्ट चर्च’ची कलात्मकता तुमच्या मनाला तृप्त करून टाकणारी आहे. तर पालयम येथील जुमा मशिद आणि भीमापल्लीतील गुलाबी मशिद तुम्हाला अचंबित करून सोडणारी आहे. 1931 मध्ये त्रावणकोरच्या महाराणींकडून दगडाद्वारे तयार करविण्यात आलेले तिरुअनंतपुरम येथील सेंट्रल रेल्वेस्टेशनही अनोखे आहे.
केळीच्या पानांवरील जेवण
विशेष निमित्तांवर केळीच्या पानांमध्ये येथील विशेष खाद्यपदार्थ वाढले जातात. ज्यात अनेक प्रकारची खीर, पापड, नेतोली, नेम्मीन, सांबार, माशांसोबत खेकडे अन् स्क्वीड इत्यादींचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये उन्नीअप्पम, पुट्ट, डोसा, पॅथ्थरी, इडली, अप्पम, उपमा इत्यादी पर्याय मिळतात. संध्याकाळी मीटर कॉफी किंवा चहासोबत वडा, केळी किंवा फणसाचे चिप्स यांचा आनंद घेता येतो. मुरुकु, पडमपूरी, परिप बोंडा चवीने येथे खाता येऊ शकते.
कलासक्त शहर
तिरुअनंतपुरम येथील वेस्ट फोर्टनजीक नृत्य-संगीत शिकणाऱया मुला-मुलींचे गट दिसून येतात. कंटेम्परेरी आर्ट म्युझियममध्ये स्वतःची चित्रकला सांभाळणाऱया तरुण-तरुणींमध्ये राजा रवि वर्मा यांची झलक दिसून येते. नृत्य, संगीत, चित्रकलेत पारंगत शेकडो लोकांची जन्म आणि कर्मभूमी राहिले आहे हे शहर. अय्यप्पा पण्णिकर आणि सुगत कुमारी यांची तिरुअनंतपुरम हे शहर कर्मभूमी राहिले आहे. भारतीय ज्ञानपीठ आणि साहित्य अकॅडमी पुरस्काराने सन्मानित ओएनव्ही कुरुप यांनी येथील विद्यापीठ महाविद्यालयातूनच पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले होते. किली आणि कर्मना नदीनजीक उभे राहून बिघडणारे हवामान, बदलणारे शहर, फैलावणारे प्रदूषण पाहून मनाला डागण्या बसतात. परंतु पुलमुड्डी किंवा अगस्त्य मालाच्या सुरम्य एकांतात पोहोचल्यावर, आकुल्लम येथील सरोवरात विहार केल्यावर पुन्हा आशेचा किरण जागा होतो.
कॉम्रेडांची नगरी
आयआयएसटी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इस्रो, नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज यासारख्या अनेक संशोधन केंद्रांचा अभिमान हे शहर बाळगून आहे. देशातील पहिले इन्फोटेनमेंट इंडस्ट्रियल पार्क देखील याच शहरात आहे. हे शहर तुम्हाला जोडून घेण्याची संधी आणि जागा दोन्हीही देते. तिरुअनंतपुरम हे सर्वांचे शहर आहे. या शहरात मजूरही तितक्याच सन्मानाने जगू शकतो, ज्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी जगतो. याचे श्रेय शिक्षण आणि समानतेची धारणा आत्मसात केलेल्या समाजाला देणेचे योग्य ठरते. याचबरोबर तिरुअनंतपुरम हे कॉम्रेडांचे शहर म्हणून ओळखले जाते.
तिरुअनंतपुरमचा इतिहास
‘तिरु’ एक दक्षिण भारतीय आदरार्थी आद्याक्षर तसेच संस्कृतच्या ‘श्री’चे रुप आहे. उदाहरणार्थ तिरुचिरापल्ली, तिरुपती, तिरुवल्लुवर या नावांमध्ये तिरु हा शब्द दिसून येतो. याचा संस्कृतमधील समानार्थी शब्द ‘श्री’ आहे. तिरुअनंतपुरम या नावाचा अर्थ ‘भगवान अनंतचे वास्तव्यस्थान’ असा होतो. भगवान अनंत म्हणजेच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शेषनागावर विराजमान झालेले भगवान विष्णू आहेत. येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात भगवान विष्णूंची शेषनागावर विराजमान झालेली मूर्ती आहे. ब्रिटिश राजवटीपर्यंत या शहराला त्रिवेंद्रम म्हणून ओळखले जात होते. 1991 मध्ये राज्य सरकारने याचे नाव बदलून तिरुअनंतपुरम केले. परंतु बऱयाचवेळा अद्याप त्रिवेंद्रम या नावाचाच वापर होत असल्याचे दिसून येते. हे एक प्राचीन शहर असून याचा इतिहास ख्रिस्तपूर्व 1 हजार वर्षांपासून सुरू होतो. त्रावणकोरचे संस्थापक मार्तंडवर्मा यांनी तिरुअनंतपुरमला स्वतःच्या राजधानीला दर्जा दिला होता. स्वातंत्र्यानंतर हे शहर त्रावणकोर-कोचीनची राजधानी ठरले. 1956 मध्ये केरळ राज्याची स्थापना झाल्यावर याला राज्याच्या राजधानीचा दर्जा मिळाला. पश्चिम घाट परिसरातील हे शहर प्राचीन काळापासून एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे.
मुख्य आकर्षण
येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील सर्वात प्रमुख वैष्णव मंदिरांपैकी एक आहे. तसेच तिरुअनंतपुरममधील ऐतिहासिक स्थळ आहे. पूर्व दुर्गमधील या मंदिराचा परिसर अत्यंत विशाल असून याची अनुभूती याचे 7 मजली गोपुरम पाहूनच होते. केरळ आणि द्रविडियन स्थापत्यकलेनुसार निर्मित हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पद्मा तीर्थम, पवित्र कुंड, कुलशेखर मंडप आणि नवरात्री मंडप या मंदिराला अधिकच आकर्षक स्वरुप देत आहेत. 260 वर्षे जुन्या या मंदिरात केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात. पुरुष केवळ पंचा नेसून येथे येऊ शकतात. या मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर राजघराण्याकडे आहे. या मंदिरात दोन वार्षिकोत्सव साजरे केले जातात. शहरात एक वेधशाळा असून ती 1837 मध्ये महाराजा स्वाति तिरुनाल यांनी निर्मिली होती. ही भारतातील सर्वात जुन्या वेधशाळांपैकी एक आहे. येथे तुम्ही अंतराळाशी संबंधित बरीच माहिती प्राप्त करू शकता.
संकलन ः उमाकांत कुलकर्णी, बेळगाव