मंत्री सुभाष फळदेसाई यांचे आवाहन भाजप कार्यालयात मोफत तिरंगा झेंडा उपलब्ध
प्रतिनिधी/ पणजी
भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपापल्या घरावर तिरंगा झेंडा लावून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. जर कुणाला पैशाअभावी झेंडा घेणे जमत नसेल त्यांच्यासाठी भाजप कार्यालयात मोफत झेंडे देण्याची सोय करण्यात आल्याचे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
शनिवारी येथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष फळदेसाई बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे गोरख मांद्रेकर, नवीन पै रायकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. वास्तविक 13 ऑगस्ट सकाळपासून तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र जवळपास पन्नास टक्के लोकांनी आपल्या घरावर झेंडे लावलेले आहेत. हा उत्सव कुठल्याही राजकीय किंवा धर्माचा नसून तो राष्ट्रीय उत्सव आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाने तो साजरा करणे महत्त्वाचे आहे, असेही फळदेसाई म्हणाले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाची लोकांमध्ये जागृती करण्याचे काम केले जात आहे. गावागावातून प्रभातफेरी काढल्या जात आहेत. काही ठिकाणी मोटरसायकल रॅली काढल्या जात आहेत. गावातील तळी किंवा एखाद्या स्मारकाच्या ठिकाणी स्वच्छता करून त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले जात आहे. लहान मुलांच्या मनात देशाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण व्हावा म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाच्या हस्ते घरावर झेंडा लावावा आणि त्याचा एका फोटो काढून ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान सुरु केले असून 13 ऑगस्टपासून एक उत्सव साजरा केला आहे. समस्त गोमंतकीयांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.