आर्थिक साक्षरता सल्लागार डॉ. सुवर्णा सुर्यवंशी यांचे मत : ‘भांडवली बाजाराद्वारे संपत्तीची निर्मिती’ परिषदेचे पणजीत आयोजन
प्रतिनिधी /पणजी
प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्टय़ा सक्षम केल्याशिवाय मालमत्तेच्या मालकीमध्ये असलेली स्त्री-पुरुष अशी मोठी तफावत दूर होणे शक्य होणार नाही. त्यावर मात करण्यासाठी महिलांना उत्पन्नाचे स्रोत, बँक खाते, शेअर बाजारात गुंतवणूक असणे आवश्यक आहे, असे मत आर्थिक साक्षरता सल्लागार डॉ. सुवर्णा सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी पणजीत आयोजित केलेल्या ‘भांडवली बाजाराद्वारे संपत्तीची निर्मिती’ या विषयावरील परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी, महिला संपत्ती निर्मितीचा भाग आहेत परंतु मालमत्तेची मालकी त्यांना नाही, असे सांगताना वित्तीय बाजारातील लैंगिक असमानतेकडे लक्ष वेधले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळय़ाचा भाग म्हणून या परिषदेचे आयोजन केले होते. गोव्यातील कार्यक्रम मळा पणजी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हेग यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. सुर्यवंशी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे हरबीर सिंग मेहरोलिया, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसचे संजय नूनेस, म्युच्युअल फंड्स इन इंडिया संघटनेचे बाळकृष्ण किणी आणि आर्थिक साक्षरता सल्लागार वर्षा नेर्लेकर यांची उपस्थिती होती.
परिषदेला संबोधित करताना हेग यांनी गोवा सरकार राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. श्री. मेहरोलिया यांनी शेअर बाजारात सध्या केवळ सहा टक्के सार्वजनिक गुंतवणुक होते. हा हिस्सा 50 टक्केपर्यंत वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. अन्य वक्त्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
निर्गुंतवणुकीतून कंपन्यांना मिळते कार्यक्षमतेचे बळ : सीतारामन
तत्पूर्वी बंगळुरू येथ परिषदेचे उद्घाटन करताना मंत्री सीतारामन यांनी, एखाद्या कंपनीची निर्गुंतवणूक करणे म्हणजे ती कंपनी बंद पाडणे असा विचार नसतो. निर्गुंतवणुकीमुळे ती कंपनी अधिक कार्यक्षमतेने चालविण्याबरोबरच अधिक रोजगार निर्माण करणे हा विचार त्यामागे असतो, असे सांगितले. धोरणात्मकरित्या निर्गुंतवणूक केलेल्या कंपन्या आता इक्विटीच्या बाबतीत चांगला परतावा देत आहेत, भागधारकांना चांगला नफा देत आहेत, असेही त्या म्हणाल्या. लडाखपासून लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूह अशा 75 शहरांमध्ये लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकाचवेळी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.