मोठय़ाप्रमाणात भातपिकांचे नुकसान : बाजारपेठेवरही परिणाम : केशवनगर येथे रस्त्यावरच गुडघाभर पाणी आल्याने नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरासह ग्रामीण भागाला पुन्हा पावसाने बुधवारी झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. येळ्ळूर रस्त्यावरील केशवनगर येथे रस्त्यावरच गुडघाभर पाणी साचून होते. या पावसामुळे शेतातील पिके मात्र वाया गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर पावसाने कहर केला असून त्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दिवाळीची खरेदी पावसात भिजतच करावी लागली. गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यामध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. यावषीही ऑक्टोबर महिन्याने मध्य गाठला तरी पाऊस पडत आहे. त्यामुळे थंडीच गायब झाली आहे. या पावसाचा साऱयांनाच कंटाळा आला आहे. पिके वाया गेली आहेत. दरवषीच अशी परिस्थिती राहिल्याने आता कोणती पिके घ्यायची? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.
मध्यंतरी आलेल्या महापुरानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पाऊस जाईल अशी अपेक्षा होती. मात्र दररोज पाऊस कोसळत असल्याने पाणीच पाणी होत आहे. भातपीक पाण्याखाली गेले आहे. या पावसाने काही भाते आडवी झाली असल्याने त्यावरच पाणी साचून आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
दिवाळी एक मोठा सण म्हणून ओळखला जातो. या सणाला खरेदीवर अधिक जोर दिला जातो. मात्र पावसामुळे काहीशी मरगळ निर्माण झाली होती. मात्र परराज्यातून तसेच जिल्हय़ातून आलेल्या नागरिकांनी पावसात भिजतच खरेदी केली. या पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. दररोज दुपारी पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी विविध प्रकारचे स्टॉल मांडले आहेत. त्यांना पावसामुळे व्यत्यय निर्माण होत आहे. दिवाळी म्हटली की, थंडी असते. मात्र दिवाळी म्हटली की, गेल्या काही वर्षांपासून पाऊस अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटासह पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी जणू ढगफुटी झाली का? असाच अनुभव आला होता. या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले. तर कौलारु घरांमध्ये पाण्याची गळती लागली होती. या पावसामुळे पुन्हा रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. बळ्ळारी नाल्याला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.